वाराणसी – वर्ष २०२५ मध्ये प्रयागराज येथे महाकुंभ होणार आहे. देशाचे एकीकरण आणि सनातन धर्माला बळकटी देण्यासाठी हिंदू आचारसंहिता तयार करण्यात आली आहे. ही आचारसंहिता या महाकुंभमध्ये सादर केली जाऊन तिला विविध पिठांच्या धर्माचार्यांच्या मान्यतेची मोहर मिळणार आहे.
कर्म आणि कर्तव्यावर आधारित हिंदू आचारसंहितेचा आधार स्मृती बनवण्यात आला आहे. त्यात श्रीमद भागवत गीता, रामायण, महाभारत आणि पुराणातील उतारे समाविष्ट करण्यात आले आहेत. तब्बल ३५१ वर्षांनंतर हिंदू आचारसंहिता तयार झाली आहे.
चार वर्षांचा अभ्यास आणि विचारमंथनानंतर, काशी विद्वत परिषद आणि देशभरातील विद्वानांच्या चमूने ही आचार संहिता तयार केली आहे. प्रयागराज येथे होणाऱ्या महाकुंभात शंकराचार्य आणि महामंडलेश्वर यावर अंतिम शिक्कामोर्तब करतील. त्यानंतर धर्माचार्य देशातील जनतेला नवीन हिंदू आचारसंहिता स्वीकारण्याचे आवाहन करतील.
काशी विद्वत परिषदने ७० विद्वानांचे ११ संघ आणि तीन उप-संघ तयार केले होते. प्रत्येक संघात उत्तर आणि दक्षिणेतील प्रत्येकी पाच विद्वान सदस्य होते. संघ ४० पेक्षा जास्त वेळा भेटला आहे. मनुस्मृती, पराशर स्मृती आणि देवल स्मृती यांचाही आधार नवीन आचार संहिता करताना घेतला आहे.
सोळा संस्कार सुलभ केले आहेत
हिंदू आचारसंहितेत सोळा संस्कार सुलभ करण्यात आले आहेत. विशेषत: अंत्यसंस्काराच्या भोजनासाठी, किमान १६ जणांची संख्या निश्चित केली आहे. तसेच अशौचाचे नियम पाळावे लागतात. त्यामध्ये काही सुविधा अथवा सवलती दिल्या जाऊ शकतात.
गेल्या अनेक वर्षांत नव्याने स्मृती निर्माण झाल्या नव्हत्या. भारतीय धर्मशास्त्र हे श्रुती, स्मृती आणि पुराणांपासून बनले आहे, असे मानले जाते. काळानुरूप स्मृती निर्माण झाल्या.
प्रथम मनुस्मृती, नंतर पराशर स्मृती आणि त्यानंतर देवल स्मृती निर्माण झाली. महाकुंभात प्रथमच हिंदू आचारसंहितेच्या एक लाख प्रती वितरणासाठी छापल्या जाणार आहेत. यानंतर देशातील प्रत्येक शहरात ११ हजार प्रती वितरित केल्या जातील.
काय आहेत नवीन तरतुदी?
१. हिंदूंच्या आचारसंहितेत हिंदूंना मंदिरात बसून पूजा करण्यासाठी समान नियम
२. महिलांना अशुद्ध अवस्थेशिवाय (मासिक पाळीचे दिवस) वेदांचा अभ्यास आणि यज्ञ करण्याची परवानगी
३. प्रे-वेडींगसारखे दुष्कृत्य दूर करण्याबरोबरच रात्रीचे विवाह संपवून दिवसा विवाहाला चालना
४. भारतीय परंपरेनुसारच वाढदिवस साजरे करण्याचा आग्रह
५. स्वधर्मात परतण्याची प्रक्रिया सुलभ
६. विधवा पुनर्विवाह पद्धतीला सर्वाधिक चालना