सिमला :- गेल्या आठवडाभरात झालेल्या पावसाने हिमाचल प्रदेशात तब्बल दहा हजार कोटी रूपयांपेक्षा अधिक मालमत्तेचे नुकसान झाले असून राज्यातील विविध दुर्घटनांमध्ये एकूण 66 जण दगावले आहेत अशी माहिती राज्याचे मुख्यमंत्री सुखविंदर सुखु यांनी दिली.
या मान्सुन मध्ये दोन टप्प्यांमध्ये राज्यात प्रचंड हानी झाली असून त्यात पायाभूत सुविधांचे जे नुकसान झाले आहे ते पुर्ववत करण्यासाठी किमान एक वर्षांचा कालावधी लागेल असे त्यांनी म्हटले आहे.
सिमला आणि आसपासच्या भागात दरडी कोसळणे, भुस्खलन होणे अशा अनेक दुर्घटना घडल्या असून त्यात किमान 66 जण ठार झाल्याची माहिती मिळाली आहे.
अद्याप अनेक जण बेपत्ता आहेत. पावसामुळे सखल भागातहीं पूरसदृश स्थिती निर्माण झाली असून तेथील आठशे लोकांना वाचवण्यात प्रशासनाला यश आल्याची माहिती सरकारने दिली.