पंधराहून अधिक घरांचे नुकसान ः विजेचे खांबही जमीनदोस्त
राजगुरुनगर-मंदोशी (ता. खेड) येथील जावळेवाडीमधील 15पेक्षा जास्त घरांचे आज (दि. 11) अवकाळी जोरदार चक्रीवादळी पावसात मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. यात विजेचे खांब जमीनदोस्त झाल्याने आदिवासी भागातील या वाडीतील 25 कुटुंबांना पुढील काही दिवस अंधारात काढावे लागणार आहेत.
खेड तालुक्यातील पश्चिम भागात आज (सोमवारी) दुपारी तीनच्या सुमारास जोरदार चक्रीवादळ झाले. वादळानंतर तुरळक पावसाच्या सरी कोसळल्या; मात्र चक्रीवादळामुळे मंदोशी, शिरगाव, टोकावडे, मोरोशी, कारकुडी, धुवोली, वांजळे, पाभे आदी परिसरात वादळी पाऊस झाला. यात घरांसह शेतातील पिकांचे मोठे नुकसान झाले. जावळेवाडी चारही बाजूने डोंगरात असल्याने येथे जोराचे चक्रीवादळ झाल्याने शेतकऱ्यांच्या घरांचे मोठे नुकसान झाले. घरावरील कौले, पत्रे वादळात दूरवर उडून गेले. काही ठिकाणी मोठी झाडे जमीनदोस्त झाली आहेत. या वाडीला वीजपुरवठा करणारे विजेचे सहा ते आठ विजेचे खांब जमीनदोस्त झाल्याने वीज पुरवठा खंडित झाला आहे. अगोदरच अनेक संकटाने ग्रस्त असलेल्या या आदिवासी वाडीवर अवकाळी संकट आले आहे.
- यांच्या कुटुंबांचे नुकसान
जावळेवाडीमधील तुकाराम तिटकारे, भगवान विठ्ठल तळपे, मारुती अंभवणे, पांडुरंग धर्मा तळपे, शंकर दुलाजी तळपे, सीताराम दुलाजी तळपे, गणेश संपत जढर, रघुनाथ तुकाराम अंभवणे, कांताराम तळपे, दत्ता किसन जढर, दगडू खेमा तळपे, देवळा दुलाजी तळपे, खंडू मोतीराम मोहन, पार्वताबाई विठ्ठल वाघमारे, जनभाऊ विठ्ठल हुरसाळे या शेतकऱ्यांच्या घरांचे पत्रे, कौले चक्रीवादळात उडाली आहेत. सध्या करोना विषाणू संसर्गामुळे सर्वत्र लॉकडाऊन आहे. या कुटुंबाकडे पैसे नाहीत. त्यामुळे या नागरिकांना तात्काळ मदत मिळावी अशी मागणी होत आहे. - आज अचानक दुपारी साडेतीनच्या सुमारास जोरदार चक्रीवादळ आले. या वादळात अनेक ग्रामस्थांच्या घराचे पत्रे हवेत दूरवर उडून केले. विजेच्या तारांवर ते पडले गावाला वीजपुरवठा करणारे विजेचे सहा खांब पडल्याने वीज पुरवठा बंद झाला आहे. पडलेले खांब तात्काळ उभे करून वीज पुरवठा सुरळीत करावा, लॉकडाऊन असल्याने नुकसानग्रस्त ग्रामस्थांकडे वादळात नुकसान झालेल्या घराची दुरुस्ती करण्यासाठी पैसे नसल्याने मोठी अडचण झाली आहे. महसूल विभागाने या कुटुंबांना तातडीची मदत करावी.
-बबन गोडे, सरपंच जावळेवाडी