सध्या पावसाच्या अनियमित आणि लहरीपणामुळे “कही खुशी कही गम’ अशी स्थिती असल्याचे चित्र दिसून येत आहे. तालुक्याच्या पश्चिम भागात म्हणजेच किल्ले पुरंदर परिसरात या वर्षी पावसाच्या जोरदार आगमनाने सुरुवातीला बळीराजा सुखावला होता. मात्र, आता तालुक्याच्या पश्चिम पट्ट्यात सध्या रोज रिमझिम पाऊस सुरू असल्याने परिसरातील बळीराजा हवालदिल झाला आहे.
सतत पडणाऱ्या पावसामुळे वाटाणा, घेवडा आणि भुईमुगाचे हक्काचे पीक धोक्यात आले आहे. या भागातील शेतांमध्ये अक्षरशः तळे साचले आहे, त्यामुळे ही तीनही पिके आता शेतकऱ्यांच्या हातातून जाण्याची दाट शक्यता निर्माण झाली आहे. या भागातील शेतकऱ्यांनी बॅंका, सहकारी सोसायटींची कर्जे घेतली असून काहींनी खासगी लोकांकडून उसनवारी करून पिकांसाठी पैसे उभे कले आहेत. आता पीकच हातून गेले तर काय करायचे, हा प्रश्न शेतकऱ्यांसमोर आहे. या वर्षी पुरंदर तालुक्यात सर्वाधिक पाऊस हा किल्ले पुरंदर परिसरातील भिवडी, नारायणपूर या भागात झाला. किल्ले पुरंदर परिसरात झालेल्या अतिपावसामुळे या भागातील शेतकरी आता हवालदिल झाले असून, मोठ्या कष्टाने वाढवलेले पीक आता सोडून द्यावे लागणार असल्याची खंत त्यांना सतावत आहे.
किल्ले पुरंदर परिसरातील ओढे-नाले दुथडी भरून वाहू लागले आहेत. बंधारे ओव्हर-फ्लो झाल्यामुळे हेच पाणी ओढ्या-नाल्यांच्या माध्यमातून वाहत येऊन तालुक्यातील पुरंदरची जीवनवाहिनी असलेल्या कऱ्हा नदीला मिळत असल्यामुळे या नदीवर सासवड शहरातील सिद्धेश्वर, संगमेश्वर आणि कमळेश्वर या प्रसिद्ध महादेव मंदिराशेजारील बंधारेही वाहू लागले आहेत. संततधार रिमझिम पावसामुळे तालुक्यातील गराडे, वीर, पिलानवाडी, नाझरे या प्रमुख धरणांच्या पाणी साठ्यातही वाढ होत असताना दिसून येत आहे.
पश्चिम पट्ट्यातील दमदार पावसामुळे तालुक्यातील मुख्य धरणाच्या पाणी साठ्यात वाढ होऊ लागल्याने सासवड, जेजुरी, नीरा या प्रमुख शहरातील नागरिकांची पिण्याच्या पाण्याची चिंता मिटली आहे.