पुणे – पुणे-बंगळुरु राष्ट्रीय महामार्ग कोल्हापूर व सांगलीजवळ पाण्याखाली गेल्याने बंद ठेवला आहे. यामुळे रस्त्यावर अनेक ठिकाणी वाहने थांबविण्यात आली आहेत. परंतु, कराड शहराजवळील पाण्याची पातळी कमी झाल्याने पुणे ते कऱ्हाड रस्त्यावरील वाहतूक सुरळीत सुरू झाली आहे. तसेच, राष्ट्रीय महामार्गावरील किणी-टोलनाक्यापर्यंत वाहतूक सुरू केली आहे.
राज्य मार्ग परिवहन महामंडळानेही सेवा कराड शहरापर्यंत सुरू केली आहे. कोल्हापूरजवळील महामार्ग अद्यापही बंद असल्याने कऱ्हाडहून कोल्हापूरकडे सोडली जाणारी वाहने किणी टोलनाकापर्यंतच नेली जात आहेत. सद्यस्थितीत शिरवळ ते किणी टोल नाका या रस्त्यावर सुमारे 20 ते 25 हजार मालवाहतूक वाहने उभी आहेत. कोल्हापूरजवळील महामार्ग सुरळीत सुरू झाल्यानंतर या रस्त्यावरील वाहने सोडली जाणार असल्याचे पोलीस प्रशासनाने सांगितले.