नीरा नरसिंहपूर – नीरा नरसिंहपूर परिसरात परतीच्या पावसाने थैमान घातल्यामुळे शेतकऱ्यांची धांदल उडालेली आहे. या परिसरात पाणीच पाणी साचल्याने मका, बाजरी, कांदा, लसूण, कोथिंबीर, पालेभाज्या, आंबा, कारले, ज्वारी, हरभरा या पिकांचे अतोनात नुकसान झाल्यामुळे शेतकरी राजा दुखावलेला आहे.
पिंपरी बुद्रुक गावचे माजी सरपंच हरिभाऊ बाबुराव सुतार व सीताराम भीमराव बोडके यांच्या शेतामध्ये केलेले मक्याचे पीक पाणी साचल्यामुळे सडले आहे. अनेक शेतकऱ्यांच्या उसामध्ये पाणी साचून उसाची व केळी पिकाची अतिशय साचलेल्या जास्त पाण्यामुळे नासाडी झाल्यामुळे शेतकरी वर्ग नाराज आहे. स्वतःच्या पोटासाठी पिकवलेले पिकही शेतकऱ्याला पावसामुळे घेता येईना, ही अवस्था शेतकऱ्याची झाल्यामुळे राज्य सरकारने तातडीने मदत शेतकऱ्याला द्यावी. तरच शेतकरी राजा जिवंत राहील.
नरसिंहपूर, टण्णू, गिरवी, ओझरे, पिंपरी बुद्रुक, गणेश वाडी, गोंदी, लुमेवाडी, सराटी, शिंदे वस्ती या सर्वच भागातील शेतकरी राजा चिंतेत आहे. सरसकट सर्वच पिकांचे पंचनामे करून शेतकऱ्याला त्यांच्या बॅंक खात्यामध्ये मदत तातडीने द्यावी, अशी या परिसरातील शेतकरी राजा करीत आहे.