देशातील लोकसभेची निवडणूक आणि महाराष्ट्र विधानसभेची निवडणूक अद्याप दूर असल्या, तरी महाराष्ट्रातील महाविकास आघाडीतील प्रमुख घटक पक्ष असलेल्या कॉंग्रेसने “स्वबळाचा नारा’ देऊन बऱ्यापैकी खळबळ माजवली आहे. आगामी निवडणुका कॉंग्रेस पक्ष स्वबळावर लढेल आणि राज्यात सत्ता स्थापन करेल, असा दावा पक्षाचे बहुतांश नेत्यांनी केल्याने ही नवीन चर्चा सुरू झाली आहे.
शिवसेनेचे पक्षप्रमुख आणि महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी कॉंग्रेसच्या स्वबळाच्या या नाऱ्याला उत्तर देताना आता करोनाकडे लक्ष देण्याची गरज आहे. स्वबळ नंतर बघता येईल, असा टोला लगावला असला तरीही त्यांना कॉंग्रेसचा हा दृष्टिकोन लक्षात घ्यावा लागणार आहे.
आता कॉंग्रेस पक्ष दुखावला जाईल अशा कोणत्याही प्रकारची प्रतिक्रिया देता येणे शक्य नसल्याने उद्धव ठाकरे यांनी करोनाची ढाल घेऊन कॉंग्रेसला अप्रत्यक्ष टोला लगावला आहे. गेल्या काही महिन्यांपूर्वी महाराष्ट्र कॉंग्रेसच्या अध्यक्षपदी नाना पटोले यांची नियुक्ती झाल्यापासून राज्यात कॉंग्रेस पक्ष कमालीचा आक्रमक झाला असून नाना पटोले यांचे आक्रमक नेतृत्व पक्षातील इतर नेत्यांनाही मान्य आहे असे दिसते.
माजी मुख्यमंत्री आणि कॉंग्रेसचे ज्येष्ठ नेते सुशीलकुमार शिंदे यांनी जाहीरपणे नाना पटोले यांच्या आक्रमक नेतृत्वाचे कौतुक केले आहे, हे या ठिकाणी महत्त्वाचे आहे. कॉंग्रेस पक्ष सोडून इतर पक्षांमध्ये गेलेल्या काही नेत्यांना पुन्हा एकदा कॉंग्रेस पक्षामध्ये प्रवेश देण्याच्या कार्यक्रमात बोलताना पक्षाच्या बहुतांशी नेत्यांनी आगामी निवडणूक कॉंग्रेस स्वबळावर लढवेल आणि स्वबळावर सत्तेवर येईल, असा विश्वास व्यक्त केला आहे. आगामी लोकसभा निवडणुकीनंतर राहुल गांधीच देशाचे पंतप्रधान होतील, असा विश्वासही या नेत्यांनी व्यक्त केला आहे.
मरगळलेल्या कॉंग्रेस संघटनेमध्ये प्राण आणण्यासाठी अशा प्रकारच्या वक्तव्यांची गरज असली, तरी प्रत्यक्ष परिस्थिती काय आहे याचाही विचार कॉंग्रेस नेत्यांना करावा लागणार आहे. मुळात सध्याच्या महाविकास आघाडी सरकारचा कॉंग्रेस घटक पक्ष असला, तरी शिवसेना आणि राष्ट्रवादी कॉंग्रेस यांच्या तुलनेने कॉंग्रेसला सरकारमध्ये दुय्यम वागणूक मिळते, हे नाकारून चालणार नाही आणि त्याबाबतची नाराजी कॉंग्रेसच्या नेत्यांमध्ये आहेच आणि वेळोवेळी ते नाराजी व्यक्त करत असतात.
कॉंग्रेसच्या पाठिंब्यावर उद्धव ठाकरे सरकार उभे आहे, अशी जाहीर घोषणा काही दिवसांपूर्वी नाना पटोले यांनी केली होती हेही या ठिकाणी विसरून चालणार नाही. पण मुळात स्वबळाचा नारा देणाऱ्या कॉंग्रेसने गेल्या कित्येक वर्षांच्या कालावधीमध्ये महाराष्ट्रात कोणत्या ना कोणत्या पक्षासोबतच निवडणूक लढवली आहे.
सध्याच्या काळात कॉंग्रेस शिवसेनेबरोबर आणि राष्ट्रवादी कॉंग्रेसबरोबर असला तरी गेल्या 15 वर्षांच्या कालावधीमध्ये कॉंग्रेसने नेहमीच राष्ट्रवादी कॉंग्रेसबरोबर आघाडी करून निवडणूक लढवली. मधल्या काळातील एका निवडणुकीचा अपवाद वगळला तरी निवडणुकीनंतर हे पक्ष पुन्हा एकदा एकत्र आले होते.
महाराष्ट्राच्या राजकारणात प्रभावी असलेल्या कॉंग्रेस, राष्ट्रवादी कॉंग्रेस, भाजप आणि शिवसेना या पक्षांनी जेव्हा आघाडी आणि युती तोडून स्वबळावर निवडणूक लढवली तेव्हा त्याचा फायदा भाजपाला सर्वात जास्त झाला, हा इतिहास आहे. चारही पक्ष जेव्हा स्वबळावर लढले तेव्हाच भाजप सर्वात जास्त जागा जिंकून राज्यात सत्तेवर आला.
देशातील सर्वात जुना राजकीय पक्ष असणारा कॉंग्रेस पक्ष जर भाजपला आपला सर्वात मोठा शत्रू मानत असेल तर ज्या कारणांनी किंवा भूमिकेमुळे भाजपचाच फायदा होणार असेल, तर ती रणनीती स्वीकारण्याचे धाडस कॉंग्रेसचे नेते करणार आहेत का, याचाही विचार करावा लागेल. सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे स्वबळाचा नारा देणे राजकीय रणनीती असेल तर पक्ष संघटनेची तेवढी तयारी आहे का, याचाही विचार करावा लागणार आहे.
जेव्हा सर्व राजकीय पक्ष स्वतंत्रपणे लढत होते तेव्हा बहुतेक सर्व राजकीय पक्षांची 288 उमेदवार मिळवण्यासाठी दमछाक झाली होती, ही बाबही लपून राहिलेली नाही. कॉंग्रेसची परिस्थिती फारशी वेगळी आहे, असे नाही. गेल्या कित्येक वर्षांच्या कालावधीमध्ये कॉंग्रेसला निवडणुकीमध्ये लक्षणीय यश न मिळाल्याने कॉंग्रेसच्या संघटनेमध्ये मोठ्या प्रमाणावर मरगळ आलेली आहे.
स्थानिक पातळीवरील अनेक कार्यकर्ते पक्ष सोडून एक तर राष्ट्रवादी कॉंग्रेसमध्ये किंवा भाजपमध्ये गेले आहेत. सध्याच्या परिस्थितीमुळे कोणत्या प्रकारचे राजकीय आंदोलने शक्य नसली तरी करोना पूर्वीच्या परिस्थितीमध्येही कॉंग्रेसच्या कार्यकर्त्यांनी कोणतेही लक्षणीय आंदोलन करून लक्ष वेधून घेतले आहे, असे झालेले नाही.
कोणत्याही नवीन राज्यांमध्ये निवडणुकीच्या दृष्टिकोनातून प्रवेश करताना भाजपा ज्याप्रकारे बूथ मॅनेजमेंटचा विचार करतो त्याच धर्तीवर आता कॉंग्रेसला पुन्हा एकदा तळागाळातून कार्यकर्त्यांचे नेटवर्क वाढवण्याचा विचार करावा लागणार आहे.
ज्या राज्यांमध्ये भाजपाचे अजिबात अस्तित्व नाही अशा पश्चिम बंगाल सारख्या राज्यामध्ये केवळ बूथ मॅनेजमेंटचा विचार करून भाजप विधानसभा निवडणुकीमध्ये 70 पेक्षा जास्त जागा जिंकत असेल, तर कार्यकर्त्यांचे पाठबळ ही ज्या पक्षाचे एकेकाळी भांडवल होते त्या कॉंग्रेस पक्षाला ते का शक्य नाही, त्याचाही विचार या नेत्यांना आता करावा लागणार आहे.
महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीसाठी अद्याप तीन वर्षांचा कालावधी असल्याने कॉंग्रेसला आपला स्वबळाचा नारा जर खरेच करायचा असेल तर आतापासूनच तयारी करावी लागणार आहे. मुख्य म्हणजे महाविकास आघाडी सरकारमध्ये शिवसेना आणि राष्ट्रवादी कॉंग्रेस यांच्या सोबत कॉंग्रेसची आघाडी असल्याने कॉंग्रेसला स्वबळाचा नारा हा केवळ शिवसेनेला इशारा नाही, तर राष्ट्रवादी कॉंग्रेसलाही इशारा आहे.
त्यामुळेच कॉंग्रेससह राष्ट्रवादी कॉंग्रेसचे ज्येष्ठ नेते प्रफुल्ल पटेल यांनी कॉंग्रेसच्या या नाऱ्याची खिल्ली उडवली आहे आणि आता या गोष्टी बोलण्याची वेळ नाही अशीही टीका केली. राष्ट्रवादी कॉंग्रेससोबत आघाडी असतानाही कॉंग्रेसकडे मुख्यमंत्रिपद असले, तरी महत्त्वाची खाती मात्र राष्ट्रवादी कॉंग्रेसकडे असल्याने कॉंग्रेसला नेहमीच दुय्यम वागणूक मिळत असल्याची भावना तेव्हाही वाटत होती.
आता तर महाविकास आघाडी सरकारमध्ये शिवसेनाही राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या जास्त जवळ असल्याने कॉंग्रेसला मनात असुरक्षिततेची भावना निर्माण झाली असल्यास नवल नाही आणि त्याच भावनेतून त्यांनी हा स्वबळाचा नारा दिला आहे.
अर्थात कोणत्याही राजकीय पक्षाला आपले बळ वाढविण्याचा अधिकार असल्याने कॉंग्रेसने आपल्याला पूर्वीचे वैभव प्राप्त व्हावे यासाठी प्रयत्न केल्यास त्यात चुकीचे काही नाही, पण हा नारा प्रत्यक्षात आणण्यासाठी पक्षाला मोठ्या प्रमाणावर प्रयत्न करावे लागणार आहेत, हे मात्र निश्चित.