भारतीय क्रिकेट संघाच्या कसोटी फॉर्मेटचे नेतृत्व करण्याची जबाबदारीही धडाकेबाज फलंदाज रोहित शर्मा याच्याकडे देण्याचा निर्णय बीसीसीआयने घेतल्याने आता रोहित शर्माचा “कसोटी’चा काळ सुरू झाला आहे, असे म्हणायला हरकत नाही. यापूर्वीच बीसीसीआयने रोहित शर्माकडे टी 20 आणि एकदिवसीय या दोन्ही क्रिकेटसंघाचे नेतृत्व दिले आहे. आता त्याच्याकडे कसोटी क्रिकेटचे कर्णधारपद देण्यात आले आहे.
मुळात गेल्या काही महिन्यांच्या कालावधीत ही तिन्ही पदे सांभाळणाऱ्या विराट कोहलीवर जबाबदारी जास्त असल्याने त्याने जेव्हा टी-20 चे नेतृत्व सोडले तेव्हा त्याला एकदिवसीय क्रिकेटचे नेतृत्वही सोडण्यास सांगण्यात आले होते आणि बीसीसीआयच्या या भूमिकेमुळे संतापून विराट कोहलीने नंतर कसोटी क्रिकेटचे कर्णधारपदही सोडले. खरे तर अनेक देशांमध्ये कसोटी क्रिकेट आणि इतर दोन प्रकारचे क्रिकेट वेगळे ठेवण्याचा प्रयत्न होत आहे. कसोटी क्रिकेटसाठी वेगळी क्रिकेट शैली आणि संयम या दोन गुणांची गरज असते. विराट कोहलीने सर्व प्रकारच्या क्रिकेट कर्णधारपदाचा राजीनामा दिल्यानंतर बीसीसीआयलासुद्धा अशा प्रकारचा प्रयोग करण्याची संधी उपलब्ध होती; पण त्यांनी ती संधी गमावली, असे यानिमित्ताने म्हणावे लागते.
विद्यमान भारतीय क्रिकेट संघाची आता पुन्हा एकदा नव्याने पुनर्रचना झाली आहे. कारण या संघातील बहुतेक सिनियर्स आता बाजूला गेले आहेत. श्रीलंका दौऱ्यासाठी जो संघ जाहीर केला आहे त्यामधून अजिंक्य राहणे, चेतेश्वर पुजारा, वेगवान गोलंदाज ईशांत शर्मा आणि यष्टीरक्षक रिद्धीमान साहा यांना वगळण्यात आले आहे. या खेळाडूंना भविष्यात संधी दिली जाऊ शकते असे जरी म्हटले असले, तरी नजीकच्या कालावधीत श्रीलंकेच्या कसोटी दौऱ्यानंतर कोणतीही मोठी कसोटी मालिका होणार नसल्याने या सर्व सिनिअर खेळाडूंना परत एकदा संधी मिळण्याची शक्यता जवळजवळ कमी आहे. त्यामुळे भारतीय क्रिकेटसाठी मोठी कामगिरी करणाऱ्या या सर्वच क्रिकेटपटूंची कामगिरी आता संपली आहे, असेच म्हणावे लागते.
अजिंक्य रहाणे सारख्या खेळाडूने विराट कोहलीच्या अनुपस्थितीत भारतीय संघाचे कर्णधारपद भूषवत अनेक चांगले विजय मिळवून दिले आहेत. त्यांची वैयक्तिक कामगिरी गेल्या काही महिन्यांमध्ये चांगली होत नसली तरी त्याच्यामध्ये अजून बरेच क्रिकेट बाकी आहे, असे अनेक क्रिकेट तज्ज्ञांचे मत आहे. या संघ निवडीच्या घोषणेनंतर रिद्धीमान साहाने ज्याप्रमाणे संतापाची प्रतिक्रिया व्यक्त केली आहे ते पाहता हा क्रिकेटचा संघ जाहीर करताना बीसीसीआयकडून कोणती ना कोणती एखादी चूक होत आहे काय याचा विचार करावा लागणार आहे. जी चूक विराट कोहलीबाबत झाली होती तीच रोहित शर्माबाबत केली असे म्हणावे लागते. रोहित शर्माकडे टी-20 आणि एकदिवसीय क्रिकेटचे नेतृत्व असल्याने कसोटी क्रिकेटचा नेतृत्व अन्य कोणाकडे देऊन एक चांगला प्रयोग करण्याची संधी बीसीसीआयला होती; पण सध्याच्या संघातील इतर सर्वच खेळाडू ज्युनियर असल्याने त्याबाबत त्या खेळाडूंवर विश्वास ठेवण्याची भूमिका बीसीसीआयला घेता आली नाही.
भारतीय संघातील सध्याचे जे खेळाडू आहेत त्यापैकी ऋषभ पंत असो श्रेयस अय्यर असो किंवा राहुल असो त्यांच्याकडे नेतृत्वगुण आहेत. आयपीएल क्रिकेट स्पर्धेमध्ये काही संघाचे नेतृत्वही हे युवा खेळाडू करत आहेत. त्यामुळे एकतर या खेळाडूंकडे एकदिवसीय क्रिकेटचे नेतृत्व देऊन रोहित शर्माकडे फक्त कसोटीचे नेतृत्व दिले असते, तर एक चांगला प्रयोग करण्याची संधी बीसीसीआयला मिळाली असती. तसे न करता पुन्हा एकदा ज्या प्रकारे विराट कोहलीच्या कारकिर्दीत होत होते त्याच प्रकारचा अनुभव आता रोहित शर्माच्या नेतृत्वाखाली सर्वांना पाहायला मिळणार आहे, असाच निष्कर्ष काढावा लागेल. मुळात रोहित शर्मा कसोटी क्रिकेटमध्ये खूप उशिरा आला. तो सर्वसाधारणपणे झटपट क्रिकेटचा स्पेशालिस्ट म्हणूनच ओळखला जातो.
गेल्या कालावधीमध्ये त्याने कसोटी क्रिकेटमध्येसुद्धा चांगली कामगिरी केली असली, तरी कर्णधार पदाच्या ओझ्यामुळे त्याच्या या कामगिरीवर परिणाम झाला तर त्याचा एकूण परिणाम भारतीय क्रिकेट संघाच्या कामगिरीवर होणार आहे. याचा अर्थ एकच, आता नजीकच्या कालावधीत निश्चितच रोहित शर्माच्या नेतृत्वाची आणि त्याच्या वैयक्तिक कामगिरीची कसोटी लागणार आहे. वेस्ट इंडिजविरुद्ध सुरू असणाऱ्या झटपट मालिकेत रोहित शर्माने चांगली कामगिरी केली असली, तरी ते सातत्य आता श्रीलंकेच्या विरुद्धही ठेवावे लागणार आहे. त्यानंतर होणाऱ्या इंग्लंडविरुद्धच्या कसोटीमध्ये त्याला हे सातत्य जास्त प्रभावीपणे अमलात आणावे लागणार आहे.
खरेतर गेल्या काही मालिकांत भारतीय क्रिकेट संघातील गोलंदाज जसप्रीत बुमराह किंवा केएल राहुल आणि यष्टीरक्षक ऋषभ पंत यांच्याकडे उपकर्णधार पदाची जबाबदारी देण्यात येऊन बीसीसीआयने काही निश्चितच संकेत दिले होते. रोहित शर्माच्या नेतृत्वाखाली या सर्वांना भावी कर्णधार म्हणून घडवण्याचा विचार बीसीसीआयने बोलून दाखवला आहे. साहजिकच आता रोहित शर्मालाच आपल्या भावी कारकिर्दीचा विचार करून काही निर्णय घ्यावे लागणार आहेत.
यावर्षी ऑस्ट्रेलियात टी-20 विश्वचषक होणार असल्याने रोहितला आता त्यावरच लक्ष केंद्रित करून आपला संघ घडवावा लागणार आहे; पण मध्येच त्याच्या डोक्यावर कसोटी कर्णधारपदाचे नेतृत्व पदही बसविण्यात आल्याने या फॉर्मेटमध्येसुद्धा वैयक्तिक कामगिरीचे आणि कर्णधारपदाचे कौशल्य सिद्ध करावे लागणार आहे. त्यासाठी त्याला शुभेच्छा द्यायला हव्यात. एक मात्र निश्चित, श्रीलंका दौऱ्यासाठी संघात निवड करण्याच्या निमित्ताने बीसीसीआयने ज्याप्रकारे अजिंक्य रहाणे, चेतेश्वर पुजारा, ईशांत शर्मा, रिद्धीमान साहा या ज्येष्ठ खेळाडूंना डच्चू दिला आहे ते पाहता त्यांच्या कामगिरीचा उचित मान राखून बीसीसीआयने त्यांना मानाने निरोप देण्याचा विचारही करायला हवा.