कोची – हिंसाचाराच्या विरोधात शून्य सहिष्णुता या भारताच्या धोरणाचा पुनरूच्चार करत तमिळनाडूचे राज्यपाल आर. एन. रवि यांनी मुंबईवरील 26/11 च्या हल्ल्यावरून पाकिस्तानला इशारा दिला. यावेळी त्यांनी तत्कालीन पंतप्रधान मनमोहन सिंग यांच्या सरकारवरही टीका केली. तसेच जो बंदुकीची भाषा बोलतो त्याला त्याच भाषेत उत्तर दिले पाहिजे, असे त्यांनी म्हटले आहे.
रविवारी तमिळनाडूत अंतर्गत सुरक्षेसमोरील आव्हाने या विषयावरील चर्चासत्रात बोलताना रवि म्हणाले की, जेव्हा मुंबईवर 26/11 चा दहशतवादी हल्ला झाला तेव्हा पूर्ण देश स्तब्ध होता. मूठभर दहशतवाद्यांनी आपल्या देशाला अपमानित केले. त्याच्या 9 महिन्यांनी तत्कालीन पंतप्रधान आणि पाकिस्तानचे पंतप्रधान यांनी एका संयुक्त निवेदनावर हस्ताक्षर केले.
दोन्ही देश दहशतवादाने पीडित असल्याचे त्यात म्हटले होते. आपल्याकडे काही शत्रूबोध आहे का? पाकिस्तान आपला मित्र आहे की शत्रू हे अगोदर स्पष्ट झाले पाहिजे. तुम्ही अधांतरी राहण्याचा प्रयत्न करत असाल तर तुम्ही संभ्रमात आहात.
2008 मध्ये लष्कर ए तोयबाच्या मुंबईत दाखल झालेल्या 10 दहशतवाद्यांनी एकाच वेळी 12 ठिकाणी हल्ले केले होते. त्यात 174 जणांचा मृत्यू झाला होता, तर 300 जण जखमी झाले होते. दरम्यान, पाकिस्तानवर केलेले सर्जिकल स्ट्राइक हे चोख उत्तर होते असे नमूद करत राज्यपाल म्हणाले की, पुलवामा येथील दहशतवादी हल्ल्यानंतर आपल्या हवाईदलाने बालाकोट येथे हल्ला करत पाकला प्रत्युत्तर दिले. जर तुम्ही दहशतवादाचे काम करत असाल तर तुम्हाला त्याची किंमत मोजावी लागेल हा त्यातून दिला गेलेला संदेश होता. मनमोहन सिंग सरकारच्या काळात देशाची जी सुरक्षा होती त्यापेक्षा आताची स्थिती चांगली आहे.