वारंवार होत असलेल्या प्रकारामुळे संबंधितांवर कारवाईची ग्रामस्थांतून मागणी
पारनेर (प्रतिनिधी) – पारनेर तालुक्यातील वडनेर हवेली येथील पारनेर-विसापूर रस्त्याच्या कडेला अज्ञातांनी घातक रसायनाचा टॅंकर खाली केला. त्यामुळे वनविभागाने लावलेली झाडे जाळून गेली आहेत. या घातक रसायनामुळे जमीन नापीक होण्याची भीती ग्रामस्थांनी व्यक्त करत, संबंधितांचा शोध घेऊन त्यांच्या विरोधात कारवाई करण्यात यावी, अशी मागणी ग्रामस्थांकडून करण्यात आली आहे.
गणपती फाटा येथून काही अंतरावर असणाऱ्या वाळुंजवस्ती समोर हा प्रकार घडला आहे. यापूर्वीही हे रसायन येथे टाकण्यात आले होते. पुन्हा दुसऱ्यांदा हाच प्रकार घडला आहे. वारंवार येथे अशा प्रकारचे रसायन टॅंकरच्या माध्यमातून सोडले जात असल्याची माहिती ग्रामस्थांनी दिली. त्यामुळे परिसरातील जमिनी नापीक होऊन ते जमिनीत मुरून विहिरी, बोअरवेलचे पाणी दूषित होण्याची भीती व्यक्त केली आहे. याचा परिसरातील ग्रामस्थांच्या आरोग्यावर परिणाम होऊ शकतो.
त्यामुळे हे रसायन परिसरात टाकणाऱ्या विरोधात कारवाई करण्यात यावी, अशी मागणी स्थानिक नागरिकांकडून व्यक्त करण्यात येत आहे. हे घातक रसायन नेमके कोणत्या ठिकाणाहून येथे आणून टाकले, याचा शोध घेतला जाऊ शकतो. या रसायनाची काळजीपूर्वक विल्हेवाट लावणे गरजेचे असताना ते उघड्यावर सोडून दिल्याने परिसरातील लोकांचे आरोग्य धोक्यात येण्याची शक्यता आहे. त्यामुळे संबंधितांचा त्वरित शोध घ्यावा व त्यांच्यावर कारवाई करण्यात यावी, अशी मागणी ग्रामस्थांकडून होत आहे.