आळंदी, (वार्ताहर)- वडमुखवाडीमधील श्री संत ज्ञानेश्वर महाराज थोरल्या पादुका मंदिरात अखंड हरिनाम सप्ताहाची सांगता हरिनाम गजरात काल्याच्या कीर्तनाने झाली.
यावेळी हभप बाळासाहेब महाराज शेवाळे म्हणाले की, तीर्थक्षेत्र आळंदीला महत्त्व ज्ञानोबारायांमुळे आहे. त्याच प्रमाणे देहू तीर्थक्षेत्रा लाही श्री संत तुकाराम महाराज यांच्यामुळे महत्त्व आहे. सर्व वारकर्यांची आई माऊली आहे. आणि पिता पांडुरंग आहे. या माऊलींच्या पुण्याइनेच आत्ताच्या धकाधकीच्या काळात देखील वारकरी संप्रदाय तरला आहे.
श्री संत ज्ञानेश्वर महाराज पालखी सोहळा पंढरपूरला जात असताना सार्या विश्वाला पसायदान विश्वशांती प्रार्थना देणार्या माऊलींचे विश्रांती स्थान विसाव्याचे ठिकाण म्हणून श्री संत ज्ञानेश्वर महाराज थोरल्या पादुका मंदिर हे प्रसिद्ध स्थान आहे. त्यामुळेच या स्थानाला आळंदी एवढेच महत्व प्राप्त आहे. असे गौरवोद्गार बाळासाहेब महाराज शेवाळे यांनी काढले. ते काल्याचे कीर्तन सेवेत बोलत होते.
यावेळी कीर्तनकार बाळासाहेब महाराज शेवाळे यांचा सत्कार कार्तिक भैय्या लांडगे, पिंपरी चिंचवडचे माजी महापौर नितीन अप्पा काळजे यांचे हस्ते उपरणे, शाल, श्रीफळ देवून सत्कार करण्यात आला. या वेळी श्री संत ज्ञानेश्वर महाराज थोरल्या पादुका मंदिर ट्रस्टचे संस्थापक अध्यक्ष ड विष्णू तापकीर उपस्थित होते. कीर्तनकार माऊली महाराज करंजीकर, पखवाज वादक व्यंकटेश फड यांचा सत्कार विकास बुर्डे, सचिन तापकीर यांचे हस्ते करण्यात आला. या प्रसंगी माजी नगरसेविका विनया तापकीर, खजिनदार दत्तात्रय गायकवाड, रमेश महाराज घोंगडे, गणेश महाराज तापकीर आदी मान्यवर उपस्थित होते.