पुणे – “बुलंद भारत की बुलंद तस्वीर…हमारा बजाज…हमारा बजाज’ या गाण्याने मध्यमवर्गीयांच्या हृदयाला हात घालणारे राहुल बजाज…जुन्या काळात मध्यमवर्गीयांचे स्वत:च्या दुचाकीचे स्वप्न पूर्ण करणारे उद्योजक राहुल बजाज…भारतीय उद्योग क्षेत्राला नव्या उंचीवर नेणारे राहुल बजाज…गरजू आणि अडलेल्यांना मदत करता-करता प्रसंगी योग्य सल्ला देणारे राहुल बजाज…अशा विविध आठवणींना उजाळा देत विविध क्षेत्रांतील व्यक्तींनी ज्येष्ठ उद्योगपती राहुल बजाज यांना श्रद्धांजली अर्पण केली.
पद्मभूषण राहुल बजाज यांच्या निधनाने सामाजिक भान असलेला उद्योग जगतातील पितामह हरपला आहे. बजाज कंपनीद्वारे भारताला ऑटो उद्योगात स्वतंत्र ओळख निर्माण करुन देण्यात त्यांचा मोठा वाटा होता. गेल्या पाच दशकांमध्ये बजाज समूहाला नावारुपाला आणण्यात राहुल बजाज यांनी मोठे योगदान दिले. स्वातंत्र्यसेनानी स्वर्गीय जमनालाल बजाज यांचा देश सेवेचा वारसा त्यांनी आयुष्यभर जपला.
– अजित पवार, उपमुख्यमंत्री
स्वातंत्र्य लढा तसेच देशाच्या औद्योगिक आणि सामाजिक विकासात बजाज घराणे आणि बजाज उद्योग समूहाचे योगदान फार मोठे आहे. राहुल बजाज यांनी आपल्या कार्यकाळात बजाज उद्योग समूहाचा देश तसेच बाहेर मोठा विस्तार केला. उद्योग विश्वाबद्दल आपली मते ते परखडपणे मांडत. महाराष्ट्राच्या औद्योगिक विकास, सामाजिक दायित्व याबाबत बजाज समूहाचे योगदान मोठे आहे. राहुल बजाज यांच्या निधनामुळे देश आणि विशेषतः महाराष्ट्राने द्रष्टे औद्योगिक नेतृत्व गमावले आहे.
– भगतसिंह कोश्यारी, राज्यपाल
पाच दशकांहून अधिक काळ राहुल बजाज यांनी भारतीय उद्यमी जगतावर आपला प्रभाव टाकला. भारतीय सर्वसामान्य माणूस व मध्यमवर्गीय कुटुंबाचे परवडणाऱ्या सुखद प्रवासाचे स्वप्न राहुल बजाज यांनीच सर्वप्रथम प्रत्यक्षरूपात आणले. भारतीय प्रवासी संकल्पनेत तसेच तरुण उद्योजकांमध्येही “हमारा बजाज’ हे अविभाज्य अंग म्हणून समोरे आले.
– दिलीप वळसे-पाटील, गृहमंत्री
राहुल बजाज यांना भावपूर्ण श्रद्धांजली. त्यांच्या निधनाने उद्योग जगताची मोठी हानी झाली आहे. ईश्वर त्यांच्या आत्म्यास शांती आणि कुटुंबियांना हे दुःख पचवण्याची शक्ती देवो.
– सुभाष देसाई, उद्योगमंत्री
महाराष्ट्रासह देश आणि संपूर्ण जगात राहुल बजाज यांनी आपली ओळख निर्माण केली होती. राज्यसभेचे सदस्य म्हणून 2006 ते 2010 च्या दरम्यान निवडून गेले. शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचा आणि राहुल बजाज चांगला संवाद आणि मैत्री होती. ज्या-ज्या वेळी महाराष्ट्रावर संकटे आली त्यावेळी ते मदतीसाठी धावून आले.
– डॉ. नीलम गोऱ्हे, उपसभापती, विधानपरिषद
राहुल बजाज यांचे निधन उद्योग आणि सामाजिक क्षेत्रासाठीही धक्कादायक आहे. उद्योग व्यवसायाचा पसारा वाढवताना त्यांनी सामाजिक कार्यातही मोठे योगदान दिले. सामान्यांच्या वाहन खरेदीची स्वप्नपूर्ती करतानाचा त्यांनी देशाच्या वाहन उद्योगासाठी दिलेले योगदान जगाच्या नकाशावर भारताला ओळख मिळवून गेले.
– मुरलीधर मोहोळ, महापौर
————-
महाराष्ट्रातील औद्योगिक क्षेत्रात अव्वल स्थान मिळण्यात उद्योगपती राहुल बजाज यांनी त्यांच्या उद्योग समुहामार्फत केलेले काम मोलाचे आहे. बजाज ऑटोचे 50 वर्षे नेतृत्व करून त्यांनी त्या कंपनीला यशाच्या शिखरावर नेले. पुणे आणि पिंपरी-चिंचवड हा परिसर औद्योगिकदृष्ट्या प्रगत झाला आणि येथे समृद्धी निर्माण झाली. त्यामध्ये बजाज ऑटोचे ऐतिहासिक स्थान आहे.
– चंद्रकांत पाटील, आमदार तथा भाजप प्रदेशाध्यक्ष
राहुल बजाज यांच्या निधनाने औद्योगिक क्षेत्राची अपरिमित हानी झाली आहे. दुचाकी आणि तीनचाकी वाहनांच्या निर्मितीत त्यांनी पुण्याचे नाव आंतरराष्ट्रीय नकाशावर नेले. ते केवळ यशस्वी उद्योजकच नव्हते, तर त्यांची विचारांची दिशा स्पष्ट होती. राज्यसभेत ते आग्रही आणि अभ्यासू पद्धतीने विषयाची मांडणी करत.
– प्रकाश जावडेकर, खासदार, भाजप
फिरोदिया कुटुंबामुळे राहुल बजाज यांच्याशी माझी ओळख झाली. नवलमलजी फिरोदिया जे बजाज ऑटो बघत होते, त्यांनी कमलनयन बजाज यांना विचारले की राहुल परदेशातून शिकून आला आहे, तर त्याला काहीतरी काम दिले पाहिजे. मग फिरोदिया यांनी त्यांना बजाजमध्ये बसवले. तेव्हापासून त्यांचे काम सुरू झाले. राहुल बजाज यांचे काका रामकृष्ण यांच्यामुळे शरद पवार यांचा राहुल यांच्याशी संबंध आला. यातूनच एकमेकांचा स्वभाव आवडला म्हणून आमची मैत्री फुलत गेली. आमच्या बैठका व्हायच्या आम्ही अनेकदा भेटायचो. ते मला धाकट्या भावासारखे मानायचे. त्यांचे विकसनावर अधिक लक्ष असायचे. त्यांनी मुलांनाही तसेच शिक्षण दिले. राजीव आणि संजीव यांना वेगवेगळ्या जबाबदाऱ्या दिल्या. ते परखडपणे त्यांचे मत मांडायचे. अर्थशास्त्र त्यांचा विषय होता. एखाद्या विषयात धोरण चुकले असेल तर त्यावर ते कोणाचे सरकार आहे याचा विचार न करता ते मत मांडत असत.
– विठ्ठलशेठ मणियार, स्नेही-मित्र
देशाच्या औद्योगिक विकासात बजाज उद्योग समुहाचा वाटा मोठा असून, त्यात राहुल बजाज यांचे भरीव योगदान होते. त्यांनी बजाज उद्योग समुहाची पुण्यात उभारणी करुन अनेक लघुउद्योजकांना वाव दिला आणि असंख्य कामगारांना रोजगार देऊन त्यांचे आयुष्य घडवले. जमनालालजी बजाज हे महात्मा गांधींचे सहकारी होते. महात्मा गांधींकडून प्रेरणा घेऊन बजाज परिवार देशसेवेत सदैव कार्यरत राहिला आहे.
– मोहन जोशी, प्रदेश उपाध्यक्ष, कॉंग्रेस
पिंपरी-चिंचवड औद्योगिक वसाहतीमधील बजाज ऑटोमधील मागणीवर अनेक उद्योग तरले. बजाजला सुट्या भागांचा पुरवठा करण्यासाठी मिळणाऱ्या ऑर्डर्समुळे अनेक लघु, मध्यम व सूक्षम उद्योग निर्माण झाले. आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत आपल्या उद्योग समूहाचा दबदबा निर्माण करण्यात ते यशस्वी झाल्यानंतरही त्यांनी आपल्या मातीशी नाळ तुटू दिली नाही. आकुर्डीतील त्यांचे वास्तव्य हे तमाम पिंपरी-चिंचवडकरांना अभिमानाची बाब होती. कामगारांची काळजी, महिला कामगारांचा सन्मान आणि समाजाप्रति असलेला आदर त्यांनी काय ठेवला. त्यांच्या या असामान्य कार्यामुळे त्यांची स्मृती कायम उद्योजक व कामगारांच्या ह्दयात तेवत राहिन.
– संदीप बेलसरे, अध्यक्ष, पिंपरी चिंचवड लघु उद्योग संघटना
“ऑटो हब’ म्हणून नावारुपाला आलेल्या पिंपरी-चिंचवड औद्योगिक वसाहतीच्या भरभराटीमध्ये बजाज आणि टाटा मोटर्स या दोन्ही उद्योग समूहांचा सिंहाचा वाटा आहे. बजाज उद्योग समूहाने बाजारात आणलेल्या स्वदेशी बनावटीच्या दुचाकी वाहनांना विशिष्ट दर्जा मिळाला. हा दुचाकी उत्पादनाच्या इतिहासातील सुवर्णकाळ मानला जातो. सर्वच स्तरातील नागरिकांना परवडणाऱ्या स्वदेशी दुचाकी बनविणाऱ्या बजाज समूहाने जगातील अनेक देशांमध्ये भारतीय उत्पादने पोहचविली आहेत. हमारा बजाज ते पल्सर अशी त्यांची झेप माझ्यासारख्या उद्योजकांना स्फुर्तीदायक आहे. त्यांच्या दुचाकी, तीनचाकी निर्मितीच्या निर्णयाने उद्योग क्षेत्रात क्रांती घडली आहे.
– विजय देशमुख, संचालक, इंजिनिअरिंग क्लस्टर
राहूल बजाज यांचे साधु वासवानी मिशनशी आपुलकीचे नाते होते. त्यांच्याबद्दल दादा वासवानी म्हणाले होते, की “राहूल बजाज हे विश्वासू आणि धैर्यशील व्यक्तिमत्व आहेत.’ आपल्या जीवनाचा हेतू सर्वांना मदत करणे हा आहे, हे सत्य त्यांना उमगले होते. राहूल बजाज हे जीवनाकडे सकारात्मक नजरेने बघणारी व्यक्ती होती म्हणून ते सर्वाकडे प्रेमाच्या प्रगल्भ दृष्टीने बघत. ते आयुष्य भर बंधुभाव जपणारे आणि शांतीप्रिय माणूस होते.
– साधू वासवानी मिशन
राहुल बजाज यांच्या निधनामुळे भारतीय वाहन उद्योगाला नवा आयाम देणारा द्रष्टा उद्योगपती हरपला. उद्योग क्षेत्राला वेगळ्या उंचीवर नेणारे आणि दिशा देणारे व्यक्तिमत्व म्हणून बजाज यांची ओळख होती. उद्योग क्षेत्रात कार्यरत असतानाही त्यांच्याकडे कमालीचे सामाजिक भान होते. आदर्श उद्योजक आणि समाजसेवक गमावल्याची भावना आहे.
– राजेश राठी, व्यवस्थापकीय संचालक, सुदर्शन केमिकल्स इंडस्ट्रीज
राहुल बजाज यांचे जाणे आपल्या सर्वांसाठीच वेदनादायी आहे. ते केवळ पुण्याचेच नाही, तर देशाचे भूषण होते. उद्योग क्षेत्रातील उत्तम नेतृत्व, मार्गदर्शक आणि पितामह हरवला आहे. भारतीय ऑटोमोबाइल क्षेत्रात त्यांचे योगदान अतुलनीय होते. उद्योगसह सामाजिक कार्यात त्यांनी दिलेले योगदान सर्वांसाठी प्रेरणादायी आहे. त्यांच्या सामाजिक कार्यामुळेच मी अधिक प्रभावित झाले होते.
– रितू प्रकाश छाब्रिया, व्यवस्थापकीय विश्वस्त, मुकुल माधव फाउंडेशन
राहुल बजाज यांच्या जाण्याने मला अतीव दुःख झाले आहे. माझे वडील पी. पी. छाब्रिया यांचे ते खास मित्र होते. त्यांची ही मैत्री आमच्या तीन पिढ्यांशी आणि कुटुंबाशी जोडलेली आहे. त्यांच्या निधनाने केवळ माझे व्यक्तिगत किंवा उद्योग जगताचेच नाही, तर राष्ट्राचेही नुकसान झाले आहे. आयुष्यभरात त्यांनी केलेल्या कार्याची यादी मोठी आहे. दूरदर्शी आणि कल्पनारम्य अशा रिक्षाची निर्मिती करून सामान्य माणसाला सक्षम बनवण्याचे काम त्यांनी केले. उद्योगसह सामाजिक कार्यात त्यांचे योगदान प्रेरक आहे. त्यांचा हा वारसा राजीव आणि संजीव दोघेही पुढे घेऊन जातील, अशी अपेक्षा आहे.
– प्रकाश पी. छाब्रिया, चेअरमन, फिनोलेक्स इंडस्ट्रीज