प्रशासकीय यंत्रणा सुस्त : कार्तिक वारी अवघ्या 10 दिवसांवर
आळंदी (वार्ताहर) – तीर्थक्षेत्र विकास आराखड्याअंतर्गत आळंदी शहरात सुरू असलेली विकासाची कामे ही 90 टक्के पूर्ण झाली असली तरी, उर्वरित छोटी छोटी अपूर्ण कामे अवस्थेत असल्याने ती भाविकांसह आळंदीकरांच्या दृष्टीने देखिल गैरसोयीची ठरत आहेत.
तीर्थक्षेत्र विकास आराखड्याअंतर्गत येणाऱ्या कामात अपुरे पदपथ, चौका-चौकात दोन्ही जोड रस्त्यांच्यामध्ये लावण्यात आलेले फेव्हींब्लॉक तेही अपुर्ण अवस्थेत, नवीन बनविलेल्या पदपथावर विद्युत भुयारी केबलसाठी पुन्हा त्याची तोडफोड करण्यात आली असून भर यात्रेत त्याचा भाविकांना मोठा अडथळा ठरणार आहे. तसेच शहराच्या बाहेरील पदपथावर (उदा. चाकण, मरकळ, केळगाव, चऱ्होली खुर्द, मोशी देहूरोड, वडगांव घेनंद रस्ता, देहुफाटा (पुणे-आळंदी) आदी रस्त्यांवर) अनेक छोट्या-मोठ्या व्यापाऱ्यांनी आतापासूनच जागा अडवून विविध व्यवसाय टाकण्यास सुरुवात
केली आहे.
शहरात मरकळ रस्त्यासह ठिकठिकाणी रस्त्त्याच्या कडेला बेकायदेशीर पत्राशेड वजा गाळे काढून आव्वाच्यासव्वा भाडे आकारणी करून, नगरपालिकेच्या जागेत अतिक्रमण करून अनधिकृतपणे बांधकामाचा जणू कोणाच्या तरी वरदहस्ताने धुमधडाकाच चालविले आहे, तरी नगरपालिका फक्त बघ्याची भूमिका घेत मूग गिळून गप्प’ कशी, असा सवाल नागरिकांनी उपस्थित केला आहे. पदपथावरील अपूर्ण कामे पूर्ण करुन भाविकांसाठी येत्या कार्तिकी यात्रेत भाविकांना ती खुली करून द्यावीत. तसेच दिवसेंदिवस वाढत असलेली अतिक्रमणे त्वरित काढून घ्यावीत, अशी मागणी आता जोर धरू लागली आहे.