बेल्हे (प्रतिनिधी)- गुळुंचवाडी व अणे (ता.जुन्नर) येथे शनिवारी (दि.२) सायंकाळी साडेपाच वाजण्याच्या सुमारास चक्रीवादळ व गारपीट झाल्याने शेतकऱ्यांचं लाखो रुपयांच नुकसान झालं आहे. गुळुंचवाडीतील ठाकर वस्तीच्या समाज मंदिराचे पत्रे उडून गेले असून गावातील अनेक ठिकाणचे विजेचे खांब पडले आहेत. शेतकऱ्यांची या पावसानं मोठी धांदल उडाली.
अनेक शेतकऱ्यांचा कांदा या पावसामुळे भिजला असून करोना च्या संकटात सापडलेल्या शेतकऱ्याला अवकाळी पावसाने जोरदार तडाखा दिल्याने शेतकऱ्यांचे लाखो रुपयांचे नुकसान यामुळे होत आहे. सुमारे अर्धा तास चाललेल्या या पावसाने अनेक शेतकरी हवालदिल झाले आहेत.
दरम्यान, नुकसान झालेल्या पिकांचे पंचनामे करून शेतकऱ्यांना नुकसान भरपाई मिळण्याची मागणी जिल्हा परिषद सदस्य पांडुरंग पवार यांनी केली आहे.