तरी अवधान पघळ । करूनियाम आणिक येक वेळ । वाक्य माझें निर्मळ । अवधारीं पां ।।1341।। हें वाच्य म्हणौनि बोलिजे । कां श्राव्य मग आयिकिजे । तैसें नव्हें परी तुझें । भाग्य बरवें ।।1342।। कूर्मीचिया पिलियां । दिठी पान्हा ये धनंजया । कां आकाश वाहे बापिया । घरींचें पाणी ।।1343।। तें दुजें नव्हे कीं आत्मा । ऐसेंचि जाणावें।।
(अध्याय 18) तर आणखी एक वेळ अवधान चांगले विस्तीर्ण करून माझे निर्मळ वचन ऐक. हे वचन वाच्य आहे म्हणून बोलावे किंवा श्राव्य म्हणून ऐकावे, असे नसून हे केवळ ब्रह्मस्वरूपच आहे; परंतु तू भाग्यवान असल्यामुळे तुला हे प्राप्त झाले आहे.
हे धनंजया, कासवाच्या दृष्टीला पिले पाहताक्षणीच पान्हा फुटतो आणि ती तृप्त होतात किंवा आकाश हे चातक पक्ष्यांकरिता सर्व काळ पाणी पोटात बाळगिते, म्हणून जो व्यवहार जेथे घडत नाही, त्याचे फळ तेथेच प्राप्त होते.
अनुकूल दैव असल्यावर कोणता लाभ होणार नाही? जे आमचे प्रेम त्या प्रेमाला जो तू विषय झाला आहेस, तो तू दुसरा कोणी नसून माझा आत्माच आहे.