जैसें वर्षाकाळींचे मेघौडे । कां महाप्रळयींचें तेज वाढे । तैसें आपणावीण कवणीकडे । नेदीचि उरों ।।194।। प्रथम स्वरूपसमाधान । पावोनि ठेला अर्जुन । सवेचि उघडी लोचन । तंव विश्वरूप देखें ।।195।। इहींचि दोहीं डोळां । पाहावें विश्वरूपा सकळा । तो श्रीकृष्णें सोहळा । पुरविला ऐसा ।।196।। अ. 11वा
भगवंताने जेव्हा अर्जुनाला विश्वरूप दर्शन घडवले त्या स्थितीचे वर्णन माऊली येथे करतात. ज्याप्रमाणे वर्षा ऋतूत ढग आकाशभर वाढत जातात किंवा महाप्रलय काळातील तेज जसे सर्वत्र वाढते, त्याप्रमाणे या भगवंताच्या विश्वरूपाने आपल्या वाचून जगाचा कोणताही भाग, कोणाकडेही उरू दिला नाही.
प्रथमतः हे रूप परमार्थात निर्गुण ब्रह्म असून ते ब्रह्मच आपले स्वरूप आहे, असे साक्षात्काराचे समाधान प्राप्त होऊन, तो अर्जुन डोळे मिटून शांत झाला. नंतर त्याने लागलीच डोळे उघडले, तेव्हा विश्वरूप पाहू लागला. “या दोन्ही डोळ्यांनी मी विश्वरूपाला पाहावे’ ही जी अर्जुनाची इच्छा होती, तो इच्छेचा सोहळा श्रीकृष्ण भगवंताने अशा रीतीने पूर्ण केला.