त्रिवेणीसंगमीं नाना तीर्थें भ्रमीं । चित्त नाहीं नामीं तरी ते व्यर्थ ।।1।। नामासी विन्मुख तो नर पापिया । हरीविण धांवया न पावे कोणी ।।2।। पुराणप्रसिद्ध बोलिले वाल्मिक । नामें तिन्ही लोक उद्धरती ।।3।। ज्ञानदेव म्हणे नाम जपा हरिचें । परंपरा त्याचें कुळ शुद्ध ।।4।।
माऊली हरिपाठातील अभंगात म्हणतात, हरिच्या नामाकडे चित्त नाही आणि गंगा, यमुना, सरस्वती या तीन नद्यांचा संगम असलेल्या प्रयागास जातो, अथवा दुसऱ्या अनेक तीर्थयात्रा करतो, तर त्याचे ते करणे व्यर्थ होय. जो हरीच्या नामाविषयी विन्मुख आहे, म्हणजे ते नाम कधीही घेत नाही, तो मनुष्य अज्ञानी होय.
त्याला अज्ञानातून सोडविण्यास हरीवाचून दुसरा कोण धाव घेणारा आहे? भगवंताच्या नामाने पातकांपासून त्रैलोक्याचा उद्धार होतो असे वाल्मिकीनी रामायणात सांगितले आहे. माऊली म्हणतात, हरीच्या नामाचे जो भजन करतो त्याच्या सर्व वंशाचा उद्धार होतो.