सोलापूर – माझे नेते अजित पवार आहेत. मुख्यमंत्र्याचे काय? जाऊ द्या, मरू द्या तिकडं , असे वक्तव्य करताना सोलापूरचे पालकमंत्री दत्तात्रय भरणे यांची एका कार्यक्रमाप्रसंगी भाषणातून महापौर श्रीकांचना यन्नम यांना उद्देशून बोलताना अचानकपणे जीभ घसरली.
पालकमंत्री भरणे यांच्या या गावरान भाषेतील वक्तव्याचा विपर्यास झाला आणि भरणे यांच्या गावरान भाषेतील प्रचंड व्हायरल झालेल्या या वक्तव्याचा शिवसैनिकांनी व पदाधिकाऱ्यांनी खरपूस समाचार घेतला.
सोलापूरचे संपर्क प्रमुख आमदार तानाजी सावंत यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यामुळे आपण मंत्री झाला असून टाकून दिलेल्या माणसाला मंत्री केल्याची जाणीव पालकमंत्री भरणे यांनी ठेवावी, अशा शब्दात समाचार घेतला. तर शहरप्रमुख गुरुषांत धुत्तरगावकर यांनी पालकमंत्री भरणे यांची “जीभ हासडू” असा इशारा दिला.
शिवसेनेच्या महिला प्रमुख अस्मिता गायकवाड यांनी भरणे यांनी माफी मागावी अशी मागणी केली.तर युवा शिवसैनिक अतुल भंवर यांनी पालकमंत्री भरणे यांना सोलापुरात फिरकू देणार नाही असा इशारा दिला.
सोलापूर महानगरपालिकेच्या वतीने माझी वसुंधरा अभियान अंतर्गत एक लाख वृक्ष लागवड मोहिमेतून वीस हजार वृक्ष लागवडीचा कार्यक्रम पालकमंत्री दत्तात्रय भरणे यांच्या हस्ते झाला. या कार्यक्रमात महापौरांशी बोलताना थेट मुख्यमंत्री “जाऊ द्या,मरू द्या’ असे वादग्रस्त वक्तव्य भरणे यांनी केले. पालकमंत्री भरणे यांनी असे वादग्रस्त वक्तव्य केल्याने उपस्थित पत्रकारांसह सर्व प्रशासनातील अधिकारी आवाक झाले.
माध्यमांवर फोडले खापर
दरम्यान माध्यमांनी आपल्या वाक्याचा विपर्यास केल्याचे सांगत भरणे यांनी आपल्या चुकीचे खापर माध्यमांवर फोडले.मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याविषयी आपणास खूप आदर आहे. आपल्याला तसे म्हणायचे नव्हते.तर गावरान भाषेतील आपल्या वाक्याचा विपर्यास केल्याचे सांगत आपण दिलगिरी व्यक्त करत असल्याचे त्यांनी सांगितले. तरीसुद्धा सोलापुरात दिवसभर शिवसैनिकांनी सोशल मीडियावर पालकमंत्री दत्तात्रय भरणे यांचा पिच्छा सोडला नाही.