पेठ- सातगाव पठार (ता. आंबेगाव) परिसरात चांगला पाऊस झाल्याने पावसाळी भुईमूग पीक जोमात वाढले आहे. जमिनीत शेंगाची पूर्ण वाढ झाली असून, बटाटे पीक काढून झाल्यानंतर पुढील आठवड्यात भुईमूग पीक काढणी सुरू होण्याची शक्यता आहे.
सातगाव पठार भागात 30 टक्के शेती क्षेत्रात शेतकऱ्यांनी पावसाळी भुईमूग पीक घेतले आहे. उर्वरित क्षेत्रात बटाटा पीक घेतले आहे. भुईमूग पीक कुरवंडी, थुगाव, मतेवाडी परिसरात काढणीस आले आहे. मात्र, बटाटा काढणीची कामे वेगाने सुरू असल्यामुळे भुईमूग काढणीला उशीर होत आहे. भुईमूगाचा पाला हा खूप वाढला आहे. त्यामुळे जमिनीत दोन, तीन व चार दाणी शेंगाचा फुगवटा चांगल्या स्थितीत होत आहे. या वर्षी भुईमूगाचे उत्पादन चांगले येणार असल्याने बळीराजा आनंदात आहे.
प्रति किलो 120 ते 130 रुपये दराने भुईमूग बियाणे खरेदी करून एकरी किमान 5 ते 6 किलो बियाणे पेरणी जुलै महिन्यात शेतकऱ्यांनी केली होती. साडेतीन ते चार महिन्यांत भुईमूग पीक काढणीस येते. सतत पाऊस झाल्याने भुईमूग पिकाची वाढ चांगली झाली आहे. आता काढणीस पीक आल्याने त्यांची पाने पिवळी पडली आहेत. मजुरांचा तुटवडा जाणवत असल्याने मावळ भागातील मजूर सातगाव पठार भागात आले आहेत.
कुरवंडी, भावडी, थुगाव आदी भागांत 80 टक्के बटाटे काढून झाले आहेत तर पेठ, कारेगाव व पारगाव भागात मजुराअभावी 30 ते 35 टक्के बटाटा काढणी बाकी आहे. त्यामुळे भुईमूग काढणीस मजूर मिळत नाहीत, असे पेठ येथील शेतकरी अशोक राक्षे यांनी सांगितले.