नवी दिल्ली – नेताजी सुभाषचंद्र बोस यांच्या 125 व्या जयंतीनिमीत्ताने राष्ट्रपती रामनाथ कोविंद, उपराष्ट्रपती एम.व्यंकय्या नायडू, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी त्यांना अभिवादन केले आहे. आपल्या स्वतंत्र भारताच्या संकल्पासाठी नेताजींनी अत्यंत धाडसी पावले उचलली, त्यांचे व्यक्तिमत्व आणि त्याग देशाला नेहमीच प्रेरणा देत राहिल असे राष्ट्रपतींनी आपल्या संदेशात म्हटले आहे.
नेताजींनी भारताच्या निर्मितीसाठी दिलेल्या योगदानाकरता आपण त्यांच्यासमोर नतमस्तक होत आहोत असे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ट्विटर संदेशात म्हटले आहे. सुभाषचंद्र बोस यांच्या जयंतीनिमीत्त संसदेच्या आवारात अभिवादन कार्यक्रम झाला.
नवी दिल्लीत इंडिया गेट इथे नेताजी सुभाष चंद्र बोस यांचा ग्रेनाईटचा पुतळा उभारला जाणार आहे. हा पुतळा पुर्ण होईपर्यंत त्याठिकाणी नेताजीचा पुतळा त्रीमिती छायाप्रकाशाच्या साहाय्यानं साकार जाणार आहे. या होलोग्राम पुतळ्याचे अनावरण आज, नेताजींच्या जयंतीनिमीत्त पंतप्रधानांच्या हस्ते होणार आहे.
यावेळी पंतप्रधानांच्या हस्ते सुभाष चंद्र बोस आपत्ती व्यवस्थापन पुरस्कारांचे वितरणही केले जाईल. यंदाच्या पुरस्कारांमध्ये संस्थांच्या वर्गवारीत गुजरातमधल्या आपत्ती व्यवस्थापन संस्थेला तर वैयक्तीक वर्गवारीत प्राध्यापक विनोद शर्मा यांची या पुरस्कारासाठी निवड झाली आहे.