पारनेर (प्रतिनिधी) –पारनेर तालुक्यातील जवळा येथील ग्रामपंचायतीने गावातील सार्वजनिक गटारीचे पाणी गावातील सिद्धेश्वर नदीत सोडले आहे. त्यामुळे नदीचे पाणी दूषित झाले आहे. याबाबत नदीत सांडपाणी सोडण्यास ग्रामस्थांनी विरोध केला असून, प्रदूषण नियंत्रण विभागाच्या अधिकाऱ्यांना निवेदन देऊन आंदोलनाचा इशारा दिला आहे.
ग्रामपंचायतीकडून गावातील सांडपाणी गावाच्या जवळून वाहणाऱ्या सिद्धेश्वर नदीत सोडण्यात आले आहे. त्यामुळे या नदीवर असणाऱ्या पाचही बंधाऱ्यांचे पाणी प्रदूषित होत आहे. जवळ्यातील मेन पेठ येथील गटार योजनेचे पाणी प्राथमिक शाळेजवळील बंधाऱ्यात दोन वर्षांपूर्वी सोडण्यात आले होते. त्यामुळे बंधाऱ्यातील पाणी दूषित झाले आहे. या बंधाऱ्यालगत दलितवस्ती आहे. येथील ग्रामस्थांनी सांडपाणी नदीत सोडण्यास विरोध केला होता. मात्र त्यांचा विरोध डावलून हे पाणी नदीत सोडण्यात येत आहे.
गावातील गटार योजनांचे काम अंतिम टप्यात आहे. हे सर्व पाणी गावातील सिद्धेश्वर नदीत सोडण्यात येत आहे. परंतु येथील पठारे मळा, सालके मळा, तिकोने मळा, ढोकळे मळा, खबडी मळा येथील ग्रामस्थांनी त्यास विरोध केला आहे. याबाबतचे दीडशे ग्रामस्थांनी सह्यांचे निवेदन प्रदूषण नियंत्रण विभागास दिले आहे.