शिर्डी (प्रतिनिधी) – ग्रामपंचायत निवडणुकीचा उमेदवारी अर्ज दाखल करताना इंटरनेट सेवा वारंवार खंडीत होत आहे. त्यामुळे ऑनलाइन उमेदवारी अर्ज भरण्यास उमेदवारांना अडचणी येत आहेत. त्यामुळे उमेदवारी अर्ज दाखल करण्याची मुदत वाढवून देवून ऑफलाइन अर्ज घेण्यास परवानगी देण्याची मागणी भाजपचे ज्येष्ठ नेते आ. राधाकृष्ण विखे पाटील यांनी राज्य निवडणूक आयोगाकडे केली आहे.
राज्य निवडणूक आयोगाला पाठविलेल्या पत्रात आ. विखे पाटील यांनी म्हटले आहे की, ऑनलाइन अर्ज दाखल करण्यासाठी मोठ्या प्रमाणात होत असलेली गर्दी व इंटरनेट सुविधेतील अडथळ्यामुळे आयोगाची वेबसाइट हॅंग होण्याचे प्रमाण वाढले आहे. त्यामुळे इच्छुक उमेदवारांना अर्ज दाखल करण्यात मोठ्या समस्या निर्माण होत आहेत.
त्यातच मागील तीन दिवस लागोपाठ आलेल्या सुट्यांमुळे अर्ज दाखल करण्यासाठी आवश्यक असलेली कागदपत्रेही शासकीय कार्यलयातून वेळेत मिळाली नाहीत. त्यामुळे उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी येत असलेल्या या आडचणी लक्षात घेवून ऑफलाइन उमेदवारी अर्ज दाखल करून घेण्याबाबत आयोगाने विचार करून अर्ज दाखल करण्यास मुदत वाढही द्यावी, आशी मागणी आ. विखे पाटील यांनी पत्रात केली आहे.