औरंगाबाद – ब्रिटनमध्ये करोनाचा नवा विषाणू आढळून आल्यानंतर सर्वत्र विशेष खबरदारी घेण्यात येत आहे. महाराष्ट्रात करोनाच्या दुसऱ्या स्ट्रेनचा एकही रुग्ण नसल्याची माहिती आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी दिली आहे. 43 नमुन्यात एकही दुसऱ्या स्ट्रेनचा पॉझिटिव्ह रुग्ण नाही असे त्यांनी स्पष्ट केले आहे.
औरंगाबादमध्ये पत्रकार परिषद घेत राजेश टोपे यांनी ही माहिती दिली आहे. राजेश टोपे म्हणाले, महाराष्ट्रात कुठेही नवा करोनाचा अवतार आढळला नाही. त्यामुळे नागरिकांनी घाबरण्याचे कारण नाही. पण तरीही आवश्यक ती काळजी घेणे महत्त्वाचे आहे, असेही त्यांनी सांगितले आहे.
नव्या करोनाचा उद्रेक होत असल्याचे समोर येताच राज्यात येणाऱ्या आंतराष्ट्रीय फ्लाईट्स थांबवण्यात आल्या आहे. युकेमधील फ्लाईट थांबवणारे महाराष्ट्र हे पाहिले राज्य आहे. इतकंच नाही तर सगळ्या प्रवाशांना इन्स्टिटयूशनल क्वारंटाईनही केले जात आहे. देश आणि राज्यात योग्य ती काळजी घेतली जात आहे, असेही त्यांनी सांगितले.
नव्या करोनाच्या संसर्गाचा वेग 70 % जास्त आहे. त्यामुळे संसर्ग अधिक गतीने होऊ शकतो. यामुळे अमेरिका आणि युरोप खंडातील लोक कठोर लॉकडाऊन करत आहेत. या पार्श्वभूमीवर राज्यात असे घडू नये यासाठी नागरिकांनी स्वयंशिस्त पाळावी, असे टोपे यांनी सांगितले.