ठाणे – ज्या सरकारचा जन्मच खोक्यातून झाला आहे ते आम्हाला काय सांगतात. तसेच ही परीक्षा कठीण आहे, त्यामुळे यामध्ये लढणारे खरे शिवसैनिक आहेत, असे म्हणत माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी येथील उत्तर भारतीयांच्या मेळाव्यातून सत्ताधाऱ्यांवर निशाणा साधला.
उद्धव ठाकरे म्हणाले, जे एकमेकांमध्ये भेद करतात, त्याला हिंदुत्व म्हणत नाहीत. तसेच त्यांनी यावेळी गडकरी रंगायतनविषयी बोलताना एका जुन्या प्रसंगाचीही आठवण करून दिली. एका सभेत बाळासाहेबांना चिठ्ठी आली, ठाण्यात नाट्यगृह नाही. त्यानंतर आम्ही ठाण्याला नाट्यगृह दिले. पण सध्या इथे काही वेगळीच नाटकं सुरू आहेत,’ असे म्हणत ठाकरे यांनी मुख्यमंत्री शिंदे आणि त्यांच्या आमदारांवर निशाणा साधला.
“मीदेखील मुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली, पण मी संविधानाच्या आधारावर मुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली आहे. मी तेव्हा म्हटलं होतं की, मी कोणासोबतही भेदभाव करणार नाही’, असेही उद्धव ठाकरे यांनी यावेळी म्हटले. तसेच, “मी कॉंग्रेससोबत सरळ मार्गाने गेलो, अर्ध्या रात्री बैठका करून नाही गेलो’, असे म्हणत त्यांनी फडणवीसांवर टीकास्त्र सोडले.
बाहेर “मळ’ व भाजपात आलं की “कमळ’
ठाकरेंनी यावेळी बोलताना भाजपवरदेखील सडकून टीका केली. “सगळे भ्रष्टाचारी भाजपला लागतात. एखादा बाहेर असेल तर “मळ’ आणि भाजपात आले की “कमळ’ अशी कोटीही त्यांनी भाजपाला मारली. तसेच, तुमचे कमळ फुलवायला तुम्हाला भ्रष्टाचारीच लागतात का? असा सवालदेखील ठाकरेंनी भाजपला विचारला. इतिहासातील एकमेव असा दीर्घ काळ टिकलेला भाजप आणि शिवसेनेचा जोड होता, जो भाजपनेच आधी तोडला, असा दावाही यावेळी त्यांनी केला.
मणिपूरवर राष्ट्रपतींचे मौन का?
मणिपूरमध्ये जो हिंसाचार सुरू आहे त्यावरदेखील यावेळी ठाकरेंनी भाष्य केले. “मणिपूर मुद्द्यावर आपल्या राष्ट्रपती एक महिला असूनही गप्प का आहेत,’ असा सवालदेखील त्यांनी उपस्थित केला आहे. तर मणिपूरचे मुख्यमंत्री म्हणतात, अशा बऱ्याच घटना घडल्या आहेत. तुम्हाला असे बोलताना लाज वाटली पाहिजे, असेही त्यांनी यावेळी म्हटले.