पणजी – गोव्यात सरकार स्थापनेचा दावा करण्यास होणारा विलंब पाहता भाजपमध्ये सर्व काही आलबेल नसल्याचे सूचित होते. भाजपला सत्तेपासून दूर ठेवण्यासाठी सर्व राजकीय पर्याय खुले ठेवण्याचा विचार आम्ही करू, असे कॉंग्रेसचे ज्येष्ठ नेते दिगंबर कामत यांनी शुक्रवारी म्हटले.
गोवा विधानसभा निवडणुकीचा निकाल 10 मार्चला जाहीर झाला. त्या राज्यातील 40 पैकी 20 जागा जिंकून भाजप सर्वांत मोठा पक्ष ठरला. स्वबळावर बहुमताचा आकडा गाठण्यासाठी त्या पक्षाला केवळ 1 जागा कमी पडली. भाजपला सरकार स्थापनेसाठी 2 आमदार असणाऱ्या महाराष्ट्रवादी गोमंतक पक्षाने आणि 3 अपक्षांनी पाठिंबा देऊ केला आहे.
मात्र, आठवडा उलटून गेल्यानंतरही भाजपने सरकार स्थापनेचा दावा केलेला नाही. त्याकडे कामत यांनी येथे पत्रकारांशी बोलताना लक्ष वेधले. केवळ मतविभाजनामुळे भाजप सर्वांत मोठा पक्ष ठरू शकला. मात्र, मतांचे प्रमाण पाहता जनमत भाजपच्या विरोधात दिसते. त्या पक्षाला 33.31 टक्के मते मिळाली. तर, 66.69 टक्के मते भाजपविरोधात गेली.
ते पाहता बहुसंख्य मतदारांना भाजप नको असल्याचेच स्पष्ट होते. अनेक आमदारांनी कॉंग्रेसशी संपर्क साधून सरकार स्थापनेसाठी प्रयत्न करण्याचे आवाहन केले. गोव्याला भाजपेतर सरकार मिळण्यासाठी इतर आमदारांनी पुढे यायला हवे, अशी भूमिका त्यांनी मांडली. गोव्यात कॉंग्रेसला 11 जागा मिळाल्या आहेत.