मुंबई : विमानांची कमतरता आणि विमान कर्मचाऱ्यांच्या तसेच वैमानिकांच्या अभावामुळे गो एअर विमान कंपनीला आज दिल्ली, मुंबई, बंगलुरू, कोलकाता आणि पाटणा येथे जाणारी 18 विमाने रद्द करावी लागली आहेत.
कंपनीच्या ए 320 विमानांमध्ये काही बिघाड झाल्याने कंपनीला विमानांचीही कमतरता भासल्याने हा निर्णय घ्यावा लागला असे कंपनीच्या अधिकाऱ्यांनी सांगितले. ही विमान कंपनी स्वस्तात विमान प्रवास देत असल्याने त्या कंपनीकडे प्रवाशांची संख्याही जास्त असते.
पण आज ही विमाने रद्द झाल्याने त्यांचा मोठा खोळंबा झाला. तथापी कंपनीने या साठी जी कारणे दिली आहेत त्यात त्यांनी देशात सध्या नागरिकत्व सुधारणा कायद्याच्या विरोधात सुरू असलेल्या आंदोलनाचेही एक कारण दिले आहे.
सध्या असलेले धुक्याचे वातावरण, आंदोलने, विमानाची कमतरता, कर्मचाऱ्यांच्या संबंधात निर्माण झालेल्या समस्या अशा सर्व कारणांमुळे 18 विमाने रद्द करावी लागत असल्याचे कंपनीच्या प्रसिद्धी पत्रकात नमूद करण्यात आले आहे.
प्रवाशांना कमीतकमी त्रास होईल याची दक्षता कंपनीतर्फे घेतली जात असून त्यांची पर्यायी व्यवस्था केली जात असल्याचे कंपनीच्या अधिकाऱ्यांनी सांगितले.