सासवड – महाराष्ट्राच्या विधानसभेत झालेली घटना ही अत्यंत दुर्दैवी व असंवेदनशील आहे यासंदर्भात केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांना ट्विटरद्वारे महाराष्ट्रातील महाविकास आघाडीच्या आमदारांना “झेड प्लस’ सुरक्षा मिळावी, अशी मागणी केली असल्याचे खासदार सुप्रिया सुळे यांनी सांगितले.
सासवड (ता. पुरंदर) येथील पंचायत समितीच्या सभागृहामध्ये खासदार सुप्रिया सुळे यांनी पत्रकार परिषद घेत शिंदे-फडणवीस सरकारवर निशाणा साधला. यावेळी राष्ट्रवादी कॉंग्रेसचे पुणे जिल्हाध्यक्ष प्रदीप गारटकर, पुरंदर तालुका अध्यक्ष माणिकराव झेंडे पाटील, पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बॅंकेचे अध्यक्ष डॉ. प्रा. दिगंबर दुर्गाडे, जिल्हा परिषदेचे माजी सदस्य सुदामराव इंगळे, आदी उपस्थित होते.
खासदार सुळे म्हणाल्या की, पुणे जिल्ह्याला पालकमंत्री गेले दोन महिन्यांपासून मिळत नाही. यामुळे अनेक कामे रखडलेली आहेत विकास कामांना प्राधान्य मिळणे गरजेचे आहे. तसेच आमचा पक्ष हा 24 तास समाज हिताची कामे करत असतो त्यामुळे केव्हाही निवडणुका लागल्या तरी आम्ही तयार आहोत सातत्याने निर्णय बदलणारे हे सरकार म्हणजे “यू टर्न सरकार’ असल्याचा घाणगात त्यांनी केला.
हे निवडून आलेले सरकार म्हणजे “हनिमून’ सारखे सरकार आहे विधानसभेमध्ये भाजपा धमक्या देत असेल तर यापुढे विधान भवनात हेल्मेट घालून जावे लागेल. महाविकास आघाडीच्या आमदारांच्या जीवाला धोका आहे. गुंजवणी प्रश्नावर महाविकास आघाडीच्या काळामध्ये अनेक बैठका घेण्यात आल्या होत्या. त्याचबरोबर पुरंदर आंतरराष्ट्रीय विमानतळ व पुरंदरचा आंतरराष्ट्रीय बाजार यासारखे प्रकल्प हे झाले पाहिजेत; परंतु जागेच्या प्रश्नावर मात्र त्यांनी भाष्य करणे टाळले.
अर्थमत्र्यांचे स्वागतच करू
बारामती लोकसभा मतदारसंघांमध्ये देशाच्या अर्थमंत्री निर्मला सीतारामन येत असतील तर आम्ही त्यांचे स्वागतच करू व त्यांची तीन दिवसाची राहण्याची व्यवस्था देखील आम्ही करू सत्ता संघर्षाच्या राजकारणामध्ये आमचा न्यायदेवतेवर विश्वास आहे. नक्कीच सत्याच्या बाजूने न्याय मिळेल.