नाती जपायची एक सोपी युक्ती आहे. त्यांना बंधनात न अडकवता थोडं मोकळं सोडा, जी खरी नाती आहेत ती परत तुमच्याकडेच येतील! पण त्यासाठी तुम्हाला थोडा वेळ द्यावा लागेल. थोडी वाट पाहावी लागेल. नात्यांना मोकळेपणाने श्वास घेऊ दिला तर त्यांना वाढायला मदतच होईल. कोणतंही रोपटं जर एखाद्या मोठ्या झाडाच्या सावलीत राहिलं तर त्याची वाढ पूर्ण होणार नाही त्याला स्वतःचा सूर्यप्रकाश मिळवायची संधी मिळायलाच हवी. त्यामुळे तुमचं एखाद्या नात्यावर प्रेम आहे म्हणून त्याची सतत काळजी करत राहणं उपयुक्त नाही तर हे नातं स्वतंत्रपणे कसं विकसित होईल याकडे लक्ष द्यायला हवं. स्त्रियांच्या बाबतीत हा हळवा कोपरा फार महत्त्वाचा असतो…
एका वकील मित्राकडून एक गंमतीशीर योगायोग ऐकायला मिळाला. लग्नाला 25 वर्ष पूर्ण केलेल्या एका जोडप्याने
एकमेकांना लग्नाच्या वाढदिवसाची भेट काय पाठवली तर घटस्फोटाची नोटीस, तिही एकाच वकिलाकडून! दोघांनीही या वकिलाला खाजगीत सांगितलं होतं की त्यांच्या या निर्णयाचा सुगावा समोरच्या पार्टीला लागता कामा नये. ऐकूनच कसंतरी झालं, एवढ्या वर्षांची संगत असून, रोज एका घरात वावरत असूनही एकमेकांबद्दल त्यांच्या मनात अजिबात आदर नव्हता आणि विश्वास तर अजिबातच नव्हता. आजकालची लग्नं लवकर मोडतात अशी ओरड करणाऱ्यांचं यावर काय म्हणणं असू शकतं. लग्नाला किती वर्ष झाली आहेत यापेक्षा त्यांनी एकमेकांचा किती विश्वास संपादन केला आहे याचा निकष आजकाल जास्त महत्वाचा ठरू लागला आहे.
आजकाल कोणतंही नातं घ्या ते टिकवण्यासाठी खूप प्रयत्न करावे लागतात. पूर्वीसारखी समाजाच्या नितीमत्तेची बंधनं गळून पडल्याने असेल कदाचित पण कोणतंही नातं तुटताना त्याचं फार वाईट वाटून घेतलं जात नाही. नाती तुटण्याचा दूरगामी परिणाम काय होणार आहे याचा विचार करायलाही कुणाकडेही वेळ नसतो. पण नाती ही मनासाठी टॉनिकचं काम करत असतात. त्यामुळे नाती जणणं हे मनाचं स्वास्थ जपण्यासाठी फार गरजेचं झालं आहे. मला कुणाशी काही देणंघेणं नाही म्हणणाऱ्या लोकांनाच नात्यांची, माणसांची फार गरज असते. ही नाती टिकवायची कशी हा आजच्या जमान्यातला मोठा प्रश्न आहे. नाती टिकवताना आपण टोकाची भूमिका तर घेत नाही ना हे पाहणं फार गरजेचं झालं आहे. पूर्वीसारखं अमूक एका नात्याकडून विशिष्ट अपेक्षा करणं आता रास्त नाही. मुलांनी आई- वडिलांचा सांभाळ करावा किंवा नवरा- बायकोने वाट्टेल ते सहन करून एकत्र राहावं असं आज मानलं जात नाही. त्यांना आपापल्या मार्गाने जाण्याचं पूर्ण स्वातंत्र्य आहे. नव्हे, तोच आजच्या सामाजिक अवस्थेचा पाया बनत आहे. अशावेळी नाती टिकवायला काय करायला हवं हा प्रत्येकाला पडलेला प्रश्न आहे. त्याची उत्तरंही प्रत्येकजण आपापल्यापरिने शोधत असतो.
नाती टिकवताना एक गोष्ट प्रकर्षाने जाणवते की हा एकतर्फी मामला नाही. कुणाला तरी एकाला वाटतंय म्हणून नातं टिकत नाही तर ती दोन्ही पक्षाची मंजुरी असावी लागते. मात्र ही आत्मियता निर्माण करणं मात्र आपल्या हातात असू शकतं. नात्यात ते बंध निर्माण करताना विश्वासाचा, प्रेमाचा एक धागा गुंफला जाऊ शकतो. त्यासाठी दोन गोष्टींची पथ्यं मात्र पाळायला हवीत. एक तर अवास्तव अपेक्षांना फाटा दिला पाहिजे आणि अधिकारापेक्षा प्रेमाची भाषा वापरायला शिकलं पाहिजे. नात्यांत विश्वासाला खूप महत्व आहे. एकमेकांवर लक्ष ठेऊन, त्यांच्यावर अविश्वास दाखवून काही मिळणार नाही. आजच्या धकाधकीच्या युगात माणूस एकटा पडत चालला आहे. नवरा- बायको, भाऊ, बहिणी, घरातल्या वयस्क व्यक्ती, मित्रमैत्रिणी अशी कितीतरी नाती आपल्यासाठी असूनही कधीकधी अगदी एकटेपणा येतो. या नात्यांचा एक सुंदर गोफ तुमच्याभोवती असेल तर किती आश्वस्त वाटतं नाही? पण ही नाती आणि त्यांची उब एकाएकी निर्माण होत नाही तर हे बंध निर्माण करावे लागतात. त्यासाठी प्रत्येक नात्याला त्याची एक “स्पेस’ द्यायची गरज आहे.
स्त्रीला कायम वाटत राहतं की मी घरासाठी, घरातल्या लोकांसाठी इतकं केलंय तर मी सांगते तसं इतरांनी वागायला हवं. त्यात मायेची भावनाही असते पण समोरच्या माणसाला ते बंधन वाटू शकतं. स्त्री एकाचवेळी अनेक नात्यांमध्ये गुरफटलेली असते.ती सगळी नाती जपताना तिला तारेवरची कसरत करावी लागते. पण प्रत्येक नात्याचं महत्त्व ओळखून त्याच्याशी “डील’ करायचं ठरवलं तर बऱ्याच गोष्यी सोप्या होतील. प्रथम जोडीदाराचा विचार केला तर हे आयुष्यभराचं नातं आहे. ते रक्ताचं नाही पण तेवढंच महत्त्वाचं आहे. इथे विश्वासाला आणि संयमाला फार महत्त्व आहे. समोरच्या व्यक्तीकडून अपेक्षा बाळगल्या तरी त्या वास्तव असाव्यात, हे नातं फुलवताना एकमेकांच्या आवडीनिवडी जपणं आणि त्यांना प्रोत्साहन देणंही तितकंच महत्वाचं आहे. एकमेकांबद्दल फार “पझेसिव्ह’ राहणं या नात्याला धोकादायक ठरू शकतं. तोही वेगवेगळी नाती निभावतो आहे हे समजून घ्यायला हवं. तुम्ही जेवढं स्वातंत्र्य द्याला तेवढंच तुम्हालाही मिळेल याची खात्री बाळगा.
घरातल्या मोठ्या माणसांविषयी आदर बाळगल्याने ही नाती फुलतील. त्यांच्या जागी आपल्या घरातील मोठी माणसं असती तर हा विचार मनात जागा ठेवला की संघर्षाच्या वेळा आपोआप कमी होत जातात.एकमेकांच्या विचारस्वातंत्र्याचा आदर केला तर हे नातंही वेगळाच आदर्श बनून जाईल. मुलांच्या बाबतीत मात्र निकष थोडे वेगळे होतात. त्यांना समज येईपर्यंत त्यांच्या चांगल्या वाईटाचा विचार पालकांनाच करावा लागतो. मात्र या काळात त्यांचा विश्वास जिंकणं फार महत्वाचं असतं. त्यामुळे नंतर मित्रत्वाचं नातं तयार व्हायला मदत होते. या नात्यात अपेक्षारहित असणं जमलं तर त्याचा खरा आनंद लुटता येईल.
आजकाल भावंडांशी न पटणं हीदेखील एक मोठी समस्या होऊ लागली आहे. लग्नापूर्वीचे आपले संबंध तसेच ठेवायचे असतील तर त्यांच्या संसारात फार लक्ष न देणं ही एक गुरूकिल्ली मानायला हवी. आई- वडिलांशी भावंडाचं वागणं बदललंय असा विचार करून त्यांच्या बद्दल मनात अढी ठेवली तर ती निघणं सहज शक्य होत नाही.
सगळ्यात शेवटी पण महत्त्वाचं नातं म्हणजे मैत्रीचं. हे नातं टिकवणं ही एक कला आहे. समशिलेषु सख्यम म्हणतात तसंच आवडीनिवडी जुळल्या की मैत्री होते. बाकीच्या कारणांनी झाली तर ती मैत्री फार काळ टिकत नाही. त्यामुळे या नात्याकडून अपेक्षा करणं हीच या नात्याचा पाया ठिसूळ करणारी महत्वाची गोष्ट आहे. स्पर्धा आणि इर्षा या गोष्टीही या नात्याला मारक ठरतात. अशा सगळ्या कसरती पार करूनही नाती ही टिकवावी लागतातच कारण नात्यांशिवाय जगण्याला अर्थ नाही. हे नात्यांचं मॅनेजमेंट जमलं तर आयुष्यात सुखाचं फिक्स डिपॉजिट मात्र चांगलं जमवता येईल यात शंका नाही!
स्वाती बिवलकर