अलीकडच्या सोशल मीडियाच्या आभासी जमान्यात हे नेटवर्क खरंच नीट वर्क करत आहे का? असा नेहमी प्रश्न पडतो. फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर, व्हॉटस् ऍप इत्यादींच्या माध्यमातून आपण एकमेकांशी, एकाच वेळी अनेकांशी कनेक्टेड असतो खरं, पण परस्परांच्या दु:खात नाही तर सुखात तरी आपण खरंच कनेक्ट होतो का? आपल्या व्यक्त होण्यात काहीतरी कमी असल्याचं नाही का हो जाणवत? त्यातही खूपच औपचारिक संबंध, संवाद असल्याचं दिसतं, असंही वाटत नाही का? आणि त्या कनेक्ट होण्यात खरंच थेट संवादाचं सुख मिळतं का? ह्या माध्यमातून पुरावा निश्चितच मिळेल; पण दुरावा वाढतोय यात यत्किंचितही शंका नाही. अन्न, वस्त्र आणि निवारा ह्या आपल्या केवळ शारीरिक मूलभूत गरजा असतात, मात्र संवाद ही आपल्या अंतर्मनाची मूलभूत गरज असते.
संवाद म्हणजे नुसतं बोलणं नाही, तर विचारांचं आदानप्रदान, एकमेकांना भावनिक आणि मानसिक पातळीवर समजून घेणं. ह्या संवादांत दुसऱ्याचं बोलणं, विचार, मत समजण्यासाठी ऐकून घेणं जरुरीचं असतं. अनेकदा समजून घेण्यापेक्षा समजून सांगण्यासाठी आपण उतावीळ असतो. दुसऱ्याकडे विचार व्यक्त करण्याची माणसाला जशी गरज असते, तशीच दुसऱ्याचे विचार ऐकून घेणे हीसुद्धा आपल्या अंतर्मनाची गरज असते, ह्याची जाणीव होणं आवश्यक असतं. ह्या विचारांच्या देवाणघेवाणीमुळे आपल्या विचारांना नवा आयाम मिळतो, अर्थात वैचारिक प्रगल्भता वाढीस लागते, सृजनशीलतेला नवे पैलू पडत जातात, ज्ञानात भर पडत जाते. आपल्या व्यक्तिमत्त्वाचं आणि उणिवांचं स्वतःला मूल्यांकन करता येतं. आपलं मानसिक आरोग्य सुदृढ राहातं, हे महत्त्वाचं आहे. अर्थात, संपन्न व्यक्तिमत्त्वासाठी निरोगी मन आवश्यक असतं आणि निरोगी मनासाठी संवादाची गरज असते, ह्याची जाणीव असणं आवश्यक असतं.
वक्तृत्वाची व्यक्तिगत गरज
व्यक्त होणारीच व्यक्ती असते, अशाच व्यक्तीचं व्यक्तिमत्त्व चार चौघांपेक्षा निराळं असतं. हे व्यक्त होणं म्हणजेच एकप्रकारे संवाद साधणं असतं. प्रत्येक व्यक्तीला व्यक्त होण्याची अपेक्षा, आवश्यकता, जरुरी, गरज असतेच. कितीही कोणीही ठरवलं, तरीही मौन पाळणे जमत नाही. आपल्याला फार काळ मौनात राहणं शक्य होत नाही. व्यक्तिगत पातळीवर संवादाची गरजच नाही अशी व्यक्ती शोधूनही सापडणार नाही. शरीरानं एकटी असणारी व्यक्ती जेव्हा मानसिक पातळीवर देखील एकलेपण अनुभवायला लागते, तेव्हा कोणा-ना-कोणाशीतरी संवाद साधण्याचा विचार करतेच. आपल्या मनातील विचार, आलेले अनुभव, नवीन योजना, भोगलेला त्रास आणि दु:ख तसंच आनंद शेअर केल्याशिवाय स्वस्थ बसत नाही. सोशल मीडियाद्वारे का होईना, पण हे स्वतःला शक्य होईल त्या प्रकारे व्यक्त केलं जाऊ लागतं. एक प्रकारे आपलं ते वक्तृत्वच असतं. आपल्याला प्रभावी वक्तृत्वाची गरज खरंच असते का? ती कशासाठी असते? खरं तर संवादाच्या माध्यमातून साधलेलं वक्तृत्व आपल्या सजगतेचं, सतर्कतेचं एक महत्त्वाचं लक्षण मानलं जातं. आपल्या अंतर्मनात येणाऱ्या विचारांना आपण वेळोवेळी मोकळी वाट करून द्यायची असते, विचारांची देवाणघेवाण करायची असते. आपल्या भावनांना वाट मिळाली की एक प्रकारे अंतर्मनात आनंद प्रसूत व्हायला लागतो. ह्याच कारणास्तव आपल्याला संवादाच्या माध्यमातून वक्तृत्वाची गरज असते.
वक्तृत्वाचे महत्त्व
वक्तृत्वामध्ये संवाद महत्त्वाचा असतो. ह्या संवादासाठी किमान दोन अथवा अधिक व्यक्तींची जरुरी असते. प्रत्येक संवादात क्रिया, प्रतिक्रिया महत्त्वाच्या असतात. एकप्रकारे घडलेल्या संवादाला मिळालेला तो प्रतिसाद असतो. संवाद म्हणजे व्यक्त होणं, आपल्या अंतर्मनात आलेले विचार तोंडानं अथवा देहबोलीतून प्रदर्शित करणं. मनात येणाऱ्या अनेक विचारांना वाट करून देण्याची गरज असते, त्यांना मोकळं करण्याची जरुरी असते. बोलून दाखवलेल्या मनातील विचारांमुळे मनावरचा ताण हलका होतो. आपल्या मेंदूत साठवलेले, आठवलेले अनेक विचार, विषय ड्रेन करण्याची आवश्यकता असते. जसं, सांडपाणी वाहून जाण्यासाठी ड्रेनेजचा वापर करावा लागतो, अगदी तद्वतच मनात आलेल्या विचारांना देखील अधूनमधून ड्रेन करणं जरुरीचं असतं. संवाद हा माणसाच्या जीवनात निरंतर असावा लागतो. सुयोग्य पद्धतीनं, नेमकेपणानं केलेल्या वक्तृत्वामुळे त्या व्यक्तीला समाजात सन्मानाचं स्थान मिळतं. केवळ बोलणं म्हणजे वक्तृत्व होत नाही. निरुद्देश, निरर्थक केलेली वायफळ बडबड ऐकायची कोणाचीही इच्छा नसते. त्यामुळे त्याकडे दुर्लक्ष केलं जातं. काहीजणांना एकतर्फी बोलत राहण्याची सवय असते; आपलं बोलणं समोरच्याला कळतंय का? पटतंय का? त्यात रस वाटतोय का? त्यासंदर्भात काही बोलायचं आहे का? हे पाहण्याचं भान काहीजणांमध्ये नसल्याचं दिसून येतं. वक्तृत्व कौशल्यासाठी आपली भाषा समृद्ध होणं गरजेचं असतं, व्याकरणाचं सखोल ज्ञान आपल्याला असायला हवं, वाचनाची आवड असावी. आपले हावभाव, देहबोली, नजर यातून जे व्यक्त होतं तेच शब्दातूनही समोर यायला हवं. ह्याच दृष्टिकोनातून वक्तृत्वाचं महत्त्व समजून घेण्याची जाणीव झाली पाहिजे.
नेतृत्व कौशल्य महत्त्वाचे
आपण आपल्या विवेकी बुद्धीच्या जोरावर त्या-त्या प्रसंगाचं मूल्यमापन करत असतो, त्या अनुषंगानं आपण संबंधित निर्णय घेत असतो. यामध्ये आपण स्वतःशीच संवाद साधत असतो, स्वतःलाच प्रश्न विचारतो, त्याची स्वतःच उत्तरं देतो. यात संप्रेषकाची आणि श्रोत्याची अशा दोन्हीही भूमिका आपण एकटेच बजावत असतो. हा संवाद व्यक्तिगत, थेट आणि निकटता निर्माण करणारा असतो, ज्यात शब्द, देहबोली यांचा अंतर्भाव नसतो. आपल्या वक्तृत्वामुळे व्यक्तीचं मन वळवणे, एखाद्यावर प्रभाव निर्माण करणे शक्य होतं. ह्या वक्तृत्वामध्ये मौखिक आणि अमौखिक संवाद शक्य असतो. त्याचबरोबर अशा संवादात तत्काळ प्रतिसादही मिळत जातो. ह्या संवादाच्या, वक्तृत्वाच्या माध्यमातून नेतृत्वाचे गुण प्राप्त होऊ लागतात. वक्तृत्व चांगलं असलं तर नेतृत्व कौशल्य देखील प्राप्त होऊ शकतं, ते अधिक महत्त्वाचं असतं.
जेव्हा दोन पेक्षा अधिक व्यक्तींचा समूह तयार होतो, तेव्हा समूहाच्या आवश्यकतेनुसार कमी अथवा अधिक संख्या ठरत असते. समूह संवादाचे रूप म्हणजे जनसंवाद. यामध्ये संप्रेषक आणि श्रोता यांचा थेट संवाद प्रस्थापित न होता तो एखाद्या जनसंवाद माध्यमाद्वारे प्रस्थापित होतो. ह्यासाठी नेतृत्व कौशल्य असणं आवश्यक ठरत असतं. नेतृत्व करण्यामध्ये व्यक्तींच्या समूहाला आपलंसं करणं महत्त्वाचं असतं. नेतृत्व करणाऱ्या व्यक्तीच्या वक्तृत्वामुळे आणि कर्तृत्वामुळे कोणत्याही व्यक्तींचा समूह विश्वासानं, आदरानं, प्रेमानं, काही ठराविक अपेक्षेनं एकत्र येतो, सहभागी होत राहतो, नेतृत्व म्हणेल, सांगेल ते ऐकायला तयारही होत राहतो.
नेतृत्वाचा प्रभाव
मिले सूर मेरा तुम्हारा, तो सूर बने हमारा… ह्या गीताप्रमाणे परस्परांतील सूर जेव्हा संवादाच्या माधमातून जुळायला सुरुवात होते, तेव्हाच त्याच्यावर ताल देखील धरला जातो. ह्यासाठी एकमेकांचं ताळतंत्र, थोडं का होईना, पण सांभाळायला लागतं. संवादाचं सुख ही ज्यांची त्यांनी अनुभूती घेण्याची बाब असते. स्वतःच भावनिक, मानसिक, आंतरिक आणि शारीरिक पातळीवर प्रत्येक संवाद घडवून आणायचा असतो. ह्या सर्वच बाबींचं समीकरण कसं मांडायचं हे ज्याला माहिती होतं, त्याला संवादात पूर्णपणे सहभागी होऊन त्या संवादाचं सुख प्राप्त करून घेता येतं. संवादाचं सुख प्राप्त करण्यासाठी सकारात्मक विचार, वर्तन आणि व्यवहार अंगीकारण्याची गरज असते. खरं तर हा पूर्णपणे त्या नेतृत्वाचा प्रभाव असल्याचं दिसून येतं. नेतृत्वामध्ये समजावून सांगण्यापेक्षा समजून घेण्याची गरज लक्षात घ्यावी लागत असते. ह्याची काहीवेळा नेतृत्वाला जाणीव राहात नाही, पर्यायानं त्याच्या नेतृत्वाला कर्तृत्वाची उणीव असल्याचं समजलं जातं. नेतृत्वामध्ये वक्तृत्वाचा आभाव असून चालत नाही ह्याची जाणीव सतत ठेवणं महत्त्वाचं असतं.
वक्तृत्व, कर्तृत्व आणि नेतृत्व
ज्या व्यक्तीनं वक्तृत्व, कर्तृत्व आणि नेतृत्व ह्या तीनही गुण समुच्चयाचा अभ्यासपूर्वक विचार केलेला असतो, त्या व्यक्तीचं व्यक्तिमत्त्व चार चौघांपेक्षा निश्चितच निराळं असल्याचं दिसून येतं. नेतृत्व करू इच्छिणाऱ्या व्यक्तीमध्ये वक्तृत्व आणि कर्तृत्वाची जोड असावीच लागते. ह्या दोन्हीमधून त्या व्यक्तीच्या आत्मविश्वासाची ओळख होत असते. आत्मविश्वास असल्याशिवाय वक्तृत्व आणि कर्तृत्व प्राप्त होऊ शकत नसल्याचं आपल्याला अनेकदा अनुभवायला येत असतं. नेतृत्व करणाऱ्या व्यक्तीचे विचार, वर्तन आणि व्यवहार त्या व्यक्तीच्या वक्तृत्व आणि कर्तृत्वामधून दिसून येत असतात. तेच त्या नेतृत्व करणाऱ्या व्यक्तीचं व्यक्तिमत्त्व असतं.
नेतृत्वाची गरज सर्वत्र
वक्तृत्व, कर्तृत्व, नेतृत्व ह्या तिन्हींची गरज प्रत्येक ठिकाणी, सर्वच क्षेत्रांत असते. घरात, कुटुंबात, नोकरीत, व्यवसायांत, उद्योगधंद्यात, समाजकारणात आणि राजकारणांत देखील त्याची जरुरी असते. कुशलतेने वक्तृत्व, कर्तृत्व आणि नेतृत्व ह्या तिन्हीचा योग्य उपयोग करणारी व्यक्ती स्वतः तर प्रगती करतेच, शिवाय आपल्याबरोबर इतरांच्या प्रगतीला, उत्कर्षाला, उन्नतीला, विकासाला कारणीभूत ठरत असते. आपल्यापैकी प्रत्येकामध्ये वक्तृत्व, कर्तृत्व आणि नेतृत्व हे सर्व गुण असतातच परंतु त्याचा योग्यवेळी वापर करण्याची जाणीव आपल्याला होत नाही. दैनंदिन जीवनात देखील आपल्याला अनेक प्रकारे त्यांचा वापर करून किमान आपल्या स्वतःचा सर्वांगीण विकास करून प्रगती साध्य करणं शक्य होऊ शकतं, पण आपलं तिकडे लक्षच नसतं. का बरं आपल्याला त्याची जाणीव होत नसते? आपल्या प्रगतीचं गुपित कशात आहे, हे न कळण्याचीच उणीव आपल्यात असते का? एखाद्या घरगुती कार्यक्रमाचं देखील नेतृत्व करताना, त्या कार्यक्रमात सूत्रसंचालन करताना आवश्यक वक्तृत्वाच्या बाबतीत आपण का बरं उदासीनता दाखवत असतो? त्यामधून आपल्या कर्तृत्वाची एखादी झलक का बरं आपण दाखवू शकत नाही? हाच कळीचा मुद्दा आहे.
प्रा. शैलेश कुलकर्णी