अकलूज -पत्रकारांना 50 लाख रुपये विमा कवच दिल्याबद्दल मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे आभार. मात्र, पत्रकारांना अत्यंत तुटपुंजा पगार असतो.
सद्यःस्थतीत जाहिरात व्यवसाय बंद असल्यामुळे अनेक पत्रकार आर्थिक अडचणीत आले आहेत. तरी या सर्व बाबींचा गांभीर्याने विचार पत्रकारांना विशेष आर्थिक मदतीचे पॅकेजही लवकरात लवकर जाहीर करावे, अशी मागणी डॉ. धवलसिंह मोहिते पाटील यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, उपमुख्यमंत्री अजित पवार व आरोग्यमंत्री राजेश टोपे यांचेकडे केली आहे.
लोकशाहीचा चौथा खांब असलेली पत्रकारिता हा समृद्ध समाजाचा भक्कम आधार आहे. शासन आणि जनतेमधील मुख्य दुवा असणारा हा खांब राज्यात करोनाचा फैलाव जोरात सुरू असतानाही पत्रकार जागृत पत्रकारिता करीत आहेत.
पोलीस, डॉक्टर, प्रशासकीय यंत्रणेबरोबर पत्रकार, प्रेस फोटोग्राफर बांधव ही आपल्या जिवाची पर्वा न करता जनजागृती व प्रसिद्धी देत आहेत, त्यामुळे त्यांना पॅकेज मिळाले पाहिजे, असे त्यांनी नमूद केले.