छत्रपती संभाजीनगर – मराठा आरक्षणाच्या ( Maratha arakshan ) मुद्द्यावर सरकारला दिलेली वेळ आता पाळलीच पाहिजे, तसेच गुन्हे मागे घेण्याबाबत सरकारने दिलेला शब्दही पाळला पाहिजे अशी मागणी मनोज जरांगे ( Jarange patil ) यांनी केली. त्यावर आरक्षणाच्या विषयावर जरांगे यांनी जरा सबुरीने घ्यावे, असा सल्ला मंत्री गिरीश महाजन ( Girish mahajan ) यांनी दिला.
मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावरून शासनाची तयारी कुठपर्यंत आली आहे, शिंदे समितीच्या आतापर्यंतच्या अभ्यासाची माहिती या शिष्टमंडळाने मनोज जरांगे यांना दिली. तसेच शिष्टमंडळाने त्यांच्या तब्येतीचीही चौकशी केली. राज्य सरकारच्या शिष्टमंडळात गिरीश महाजन आणि संदीपान भुमरे हे होते.
यावेळी गिरीश महाजनांनी मनोज जरांगे यांना मराठा आरक्षणाच्या विषयावर सबुरीचा सल्ला दिला. त्यावर आतापर्यंत सबुरी घेऊनच राज्य सरकारला एकूण तीन महिन्यांचा वेळ दिल्याचे जरांगे म्हणाले. त्यावर राज्य सरकार वेगाने काम करत आहे, टिकणारे आरक्षण द्यायचे असेल तर आणखी जरा वेळ द्यावा. काम अंतिम टप्प्यात आले आहे, सरकार काहीही लपवत नाही, असे महाजन म्हणाले.
त्यावर जरांगे म्हणाले, सरकार वेगाने काम करत आहेत. त्यामुळेच आतापर्यंत 54 लाख नोंदी मिळाल्या आहेत, पण सरकारने ठरल्याप्रमाणे केले पाहिजे ही आमची मागणी आहे. मात्र, राज्य सरकारचे शिष्टमंडळ आमच्याशी चर्चा करते आणि प्रसार माध्यमांसमोर हा-हा करता. पण दुसरीकडे आंदोलकांना उचलण्याचे काम पोलिसांकडून सुरूच आहे. त्यामुळे ठरलेल्या अटींवर सरकारने काम केले पाहिजे, अशी मागणी जरांगे यांनी केली.