कोलकाता- पश्चिम बंगालची विधानसभा निवडणूक तोंडावर आली असून येथे आरोप प्रत्यारोपांची राळ उडाली आहे. त्यातच भारतीय जनता पार्टीचे प्रदेशाध्यक्ष दिलीप घोष यांची जीभ घसरली असून त्यातून त्यांनी रविवारी वादग्रस्त विधान करत विरोधकांना धमकीच दिली आहे.
रविवारी घोष यांनी उत्तर परगणा जिल्ह्यात पक्षाच्या कार्यकर्त्यांना उद्देशून भाषण करताना खळबळजनक वक्तव्य केले आहे. राज्यात 2021 च्या विधानसभा निवडणुकीत तृणमूल कॉंग्रेसचा सफाया होणार आहे. आपले सरकार आल्यावर आपण त्यांचे कपडे उतरवून त्यांना बुटांनी मारू. मी जे बोलतो ते करतोच.
लोकसभा निवडणुकीच्या वेळी तृणमूल कॉंग्रेसच्या निम्मे जागाही येणार नाहीत, असे आपण म्हटले होते, याची आठवण त्यांनी यावेळी करून दिले. तसेच आपल्या भाषणात त्यांनी पोलिसांवरही हल्लाबोल केला. जे लोक पोलिसांच्या पाठबळावर सर्वसामान्यांना घाबरवण्याचा उद्योग करत आहेत, त्यांनाही आम्ही सोडणार नाही. सरकार स्थापन झाल्यावर व्याजासकट सगळ्यांचा हिशेब चुकता करू असेही त्यांनी बजावले.
पोलिसांचा एक गट सत्ताधारी तृणमूल कॉंग्रेसच्या काही नेत्यांच्या इशाऱ्यावर काम करत असल्याचा आरोप करत ते म्हणाले की, काही पोलीस नेत्यांसाठीच काम करत आहेत. मी माझ्या डायरीत सगळे लिहून ठेवले आहे. भाजपच्या कार्यकर्त्यांच्या विरोधात जे आता हिंसाचार करत आहेत, त्यांचा 2021 नंतर योग्य हिशेब केला जाईल.
घोष यांनी पुढे इशारा देताना म्हटले की या लोकांनी एक वर्षांनंतर काय होईल याचा विचार करावा. ते आपल्या बायको- मुलांचे चेहरेही पाहू शकणार नाहीत. कोणालाच सोडणार नाही. तुमची मुले त्यांचे शिक्षणही पूर्ण करू शकणार नाहीत. ते डॉक्टर किंवा इंजिनिअर होणार नाहीत. ते केवळ कामगारच होतील याची खबरदारी आम्ही घेऊ. त्यांच्या जिवनातील शांतता आम्ही नष्ट करून टाकू.
पोलीस फेसबुकच्या आधारावर कारवाई करत धरपकड करत असल्याचा आरोप करताना घोष म्हणाले की आम्ही प. बंगालमध्ये पुन्हा लोकशाही आणणार आहोत. कॉंग्रेस असो, माकप असो वा अन्य कोणताही पक्ष लोकशाही असल्याशिवाय तो पक्ष टीकू शकत नाही. या पक्षांच्या नेत्यांनीही परिवर्तनाच्या या लढ्यात आमच्या सोबत यावे असे आपण त्यांना आवाहन करतो असेही ते म्हणाले.
भारतीय जनता पार्टी राज्यात परिवर्तनासाठी लढत असून यात आतापर्यंत 100 पेक्षा जास्त कार्यकर्त्यांचा मृत्यू झाला आहे. मात्र प. बंगालमध्ये जो पर्यंत बदल घडत नाही, तोपर्यंत आमचा लढा सुरूच राहील असा दावाही त्यांनी केला