आळंदी – संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराज यांचे मंदिर त्वरीत भक्तांना दर्शनासाठी उघडावे, यामागणीसाठी मनसेच्या वतीने माऊली मंदिराच्या महाद्वारावर घंटानाद आंदोलन करीत महाविकास आघाडी सरकारच्या कारभाराचा जाहीर निषेध करण्यात आला.
जनता कोविडच्या संकटाने त्रस्त आहे. मानसिक दृष्ट्या शांती आणि शक्ती देणारी श्रद्धा स्थान बंद आहेत. जनतेच्या भावनांचा विचार करून सरकारने मंदिरे खुली करावी, अन्यथा जनता आणि महाराष्ट्र सैनिक मोठ्या प्रमाणावर रस्त्यावर उतरून जन आक्रोश आंदोलन उभे राहिल, कायदा आणि सुव्यवस्था बाबत प्रश्न निर्माण झाल्यास सरकार जबाबदार असेल, असा इशारा मनसेच्या वतीने देण्यात आला.
आळंदी शहराध्यक्ष अजय उर्फ ज्ञानेश्वर सुरेश तापकीर यांच्या नेतृत्वाखाली हे घंटानाद आंदोलन करण्यात आले. याप्रसंगी जिल्हाध्यक्ष समीर थिगळे, कामगार सेना जिल्हा अध्यक्ष मनोज खराबी, तालुका अध्यक्ष संदीप पवार, विद्यार्थी सेनेचे उपाध्यक्ष मंगेश सावंत, तुषार बवले उपस्थित होते.