मुंबई – कॉंग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी यांचे विश्वासू सहकारी आणि राजस्थानचे मुख्यमंत्री अशोक गेहलोत यांनी आज “मातोश्री’वर येऊन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची भेट घेतली. यावेळी राजशिष्टाचार मंत्री आदित्य ठाकरे उपास्थित होते. मुख्यमंत्री ठाकरे आणि अशोक गेहलोत यांच्यात सुमारे तासभर चर्चा झाली. या चर्चेचा तपशील समजू शकला नाही.
राज्यात महाराष्ट्र विकास आघाडीचे सरकार स्थापन झाल्याने अशोक गेहलोत यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची सदिच्छा भेट घेतल्याचे सांगण्यात येत आहे. अशोक गेहलोत हे कॉंग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी यांचे अत्यंत विश्वासू सहकारी आहेत. महाराष्ट्र विकास आघाडीबाबत सोनियांचा कोणता निरोप घेऊन ते उद्धव ठाकरेंना भेटले का अशीही चर्चा राजकीय वर्तुळात आहे. मात्र स्वत: उद्धव ठाकरे यांनी ही केवळ सदिच्छा भेट असल्याचे स्पष्ट केले. अशोक गेहलोत हे मुंबईत आले होते, त्यांनी भेटण्याची इच्छा व्यक्त केली होती, त्यानुसार ही भेट झाली, असे उद्धव ठाकरे यांनी सांगितले.
दरम्यान, अशोक गेहलोत हे मातोश्री बाहेर आल्यानंतर माध्यमांनी त्यांना राजस्थानातील बालमृत्यूबाबत विचारणा केली. राजस्थानात सध्या नवजात बालकांच्या मृत्यूचा प्रश्न गंभीर बनला आहे. त्यामुळे अशोक गेहलोत टीकेचे धनी बनत आहेत. मात्र अशोक गेहलोत यांनी याबाबत राजस्थान सरकार गंभीर असल्याचे सांगितले. त्याचवेळी त्यांनी नवजात बालकांच्या मृत्यूचे प्रमाण गुजरात, राजकोट, अहमदाबाद, उत्तर प्रदेश, कानपूरमध्येही असून भाजप केवळ राजकारण करत असल्याचा आरोप त्यांनी केला.