नवी दिल्ली -कॉंग्रेस नेते राहुल गांधी यांनी बुधवारी इंधन दरवाढीवरून मोदी सरकारवर जोरदार शाब्दिक हल्लाबोल केला. इंधनांवरील करांतून सरकारने 7 वर्षांत तब्बल 23 लाख कोटी रूपये कमावले. ते पैसे गेले कुठे, असा सवाल त्यांनी केला.
राहुल यांनी पत्रकार परिषद घेऊन पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि त्यांच्या सरकारवर टीकेची झोड उठवली. सरकारने सकल राष्ट्रीय उत्पादनाची (जीडीपी) नवी व्याख्या केली आहे. सरकारच्या दृष्टीने जीडीपीत वाढ म्हणजे गॅस, डिझेल, पेट्रोलच्या दरांत वाढ. एकीकडे शेतकरी, कामगार, छोटे व्यापारी, पगारदार आणि प्रामाणिक उद्योजकांसाठी नोटबंदी केली जाते. तर, दुसरीकडे मोदींच्या चार-पाच मित्रांचे खिसे भरले जातात. संपत्तीचे हस्तांतर गरिबांकडून मोदींच्या मित्रांकडे केले जात आहे, असे ते म्हणाले.
केंद्रात कॉंग्रेसच्या नेतृत्वाखालील यूपीए सरकार असतानाच्या काळातील आणि सध्याच्या इंधन दरांमधील तफावतही राहुल यांनी अधोरेखित केली. देशात 2014 मध्ये गॅस सिलिंडरचा दर 410 रूपये इतका होता. आता तो 885 रूपये झाला आहे. पेट्रोल आणि डिझेलचे दर 2014 मध्ये अनुक्रमे 71 रूपये आणि 57 रूपये होते.
त्या इंधनांचे दर आता अनुक्रमे 101 रूपये आणि 88 रूपये झाले आहेत. मागील सात वर्षांपासून इंधनांच्या आंतरराष्ट्रीय किमती कमी झाल्या आहेत. मात्र, भारतात त्यामध्ये वाढ होत आहे. आश्वासने पूर्ण करता येत नसल्याने सरकार भयग्रस्त बनले आहे. ते इंधन दरांवर तग धरून आहे. मात्र, इंधनांच्या आंतरराष्ट्रीय किमती वाढतील तेव्हा आपल्या देशातील स्थिती नियंत्रणाबाहेर जाईल, असा इशारा त्यांनी दिला.