प्रभात वृत्तसेवा पुणे, दि. 6 -लक्ष्मी रस्त्यावरून मानाच्या गणपतींचीच विसर्जन मिरवणूक प्रथेप्रमाणे सर्वांत आधी निघणार आहे. “मानाच्या गणपती विसर्जनापूर्वी लक्ष्मी रस्त्यावरून अन्य गणेश मंडळांना मिरवणूक काढण्यास परवानगी द्यावी,’ या मागणीसाठी बढाई समाजाने दाखल केलेली याचिका मुंबई उच्च न्यायालयाने फेटाळली. “मानाच्या गणपती विसर्जन मिरवणुकीसाठी 24 ते 28 तास लावतात, हे आताच गृहित धरता येणार नाही.
तसेच पोलीस त्यांचे काम नीट करतील,’ असा निष्कर्ष न्यायालयाने काढत याचिका निकाली काढली. न्यायमूर्ती संजय गंगापूरवाला यांच्या न्यायालयात या प्रकरणावर सुनावणी झाली.
“विसर्जन मिरवणुकीत लक्ष्मी रस्त्यावरून प्रथम मानाचे पाच गणपती मंडळच जातील व त्यानंतरच इतरांनी जावे हा रुढी-परंपरा व प्रथेचा भाग म्हणजे कायदा नाही. त्यामुळे इतर लहान गणपती मंडळांना विसर्जनासाठी लक्ष्मी रस्ता वापरण्यावर असणारी बंधने बेकायदेशीर व संविधानातील कलम 19 नुसार असलेल्या संचार स्वातंत्र्याचे उल्लंघन आहे,’ असा दावा करणारी याचिका बढाई ट्रस्टचे अध्यक्ष शैलेश बढाई यांनी ऍड. असिम सरोदे यांच्यामार्फत दाखल केली होती.
न्यायालयाने उपस्थित केलेले मुद्दे
आम्हाला लक्ष्मी रस्त्याचा वापर करण्यास पोलिसांनी नकार दिला, असे अनेक गणपती मंडळांचे म्हणणे आहे का?
केवळ एकाच मंडळाने का याचिका दाखल केली. जनहित याचिका का नाही?
पोलिसांनी नकार दिल्याचे लेखी पत्र आहे का?
मानाचे गणपती विसर्जन मिरवणुकीसाठी 24 ते 28 तास लावतात, हे आताच कसे गृहित धरायचे?
“मानाच्या पाच गणपती मंडळांपूर्वी इच्छा असलेल्या इतर मंडळांना मिरवणूक काढू द्यावी, ही आमची मागणी आहे. आता अनेक गणपती मंडळे पोलिसांकडे त्याप्रमाणे अर्ज करतील. परंपरा म्हणजे अन्याय असे नसते. मात्र, एका चुकीच्या रुढीविरुद्ध आवाज उठवण्यास सुरुवात झाली आहे. पोलीस निर्णय घेतील किंवा नाही, हे माहिती नाही. मात्र, नव्या दमाने पुराव्यांसह पुन्हा याचिका दाखल करणार.
– ऍड. असिम सरोदे, याचिकाकर्त्यांचे वकील