मुंबई – अल्पसंख्याक मंत्री आणि राष्ट्रवादी कॉंग्रेसचे प्रवक्ते नवाब मलिक यांनी शनिवारी भाजप नेते किरीट सोमय्यांनी केलेल्या आरोपाला जोरदार प्रत्युत्तर दिले. मी स्वतः ईडीच्या कार्यालयात जायला तयार आहे. सोमय्य्यांना ईडीने प्रवक्ता बनवले असेल, तर जाहीर करावे, असे खुले आव्हानही त्यांनी दिले.
नवाब मलिकांनी काल ट्वीट केल्यापासून पुन्हा एकदा नव्या राजकीय वादाला तोंड फुटले आहे. साथियों, सुना है, मेरे घर आज-कल मे सरकारी मेहमान आने वाले है, हम उनका स्वागत करते है. डरना मतलब रोज रोज मरना, हमे डरना नहीं, लड़ना है, गांधी लड़े थे गोरों से, हम लड़ेंगे चोरों से, असे मलिक यांनी या ट्वीटमध्ये म्हटले आहे. यावरून भाजप नेते किरीट सोमय्यांनी आज मलिकांना लक्ष्य केले होते.
मलिकांनी वक्फ बोर्डाच्या जमिनी ढापल्या आहेत. हा घोटाळा बाहेर आला म्हणूनच ते हात-पाय मारत आहेत. त्यांच्या घरी सरकारी पाहुणे नक्की जाणार, असा दावा सोमय्यांनी केला. मलिक आत्ता ट्वीट करतात. कारण त्यांना भीती वाटतेय. पुण्यात नवाब मलिक यांनी वक्फ बोर्डात घोटाळा केला आहे. ही जमीन नातेवाईकांच्या नावे केली आहे. जमिनी ढापल्या आहेत. त्यामुळेच नवाब मलिक यांना भीती वाटत आहे. आता घोटाळेबाजांची चौकशी होणार आणि चोरीचा माल जप्त होणार. पैसे देऊन, प्रेशर करून घोटाळा लपत नाही. चोरी केली तर शिक्षा होणारच, असा दावाही सोमय्यांनी केला.
किरीट सोमय्यांच्या आरोपाला नवाब मलिकांनी जोरदार प्रत्युत्तर दिले. ते म्हणाले, मी स्वतः ईडीच्या कार्यालयात जायला तयार आहे. माझ्या घरी धाड पडणार, अशी अनेक दिवसांपासून माहिती आहे. जर सोमय्यांना ईडीने प्रवक्ता बनवले असेल तर त्यांनी तसं जाहीर करावं.
मलिक म्हणाले की, वक्फ बोर्डाच्या कुठल्याच बोर्डावर छापेमारी झालेली नाही. फक्त काल एका वक्फ बोर्ड अधिकाऱ्याला बोलावण्यात आलं. खोट्या बातम्या पसरवून बदनाम करण्याचं काम थांबवा. वक्फ बोर्डानं कोणत्या केस रजिस्टर केल्या आहेत, त्याची माहिती द्यावी, असे आवाहन त्यांनी केले.