मुंबई – गेल्या एक महिन्यात खाद्यातेलाचे दर प्रति किलोला 8 ते 10 रुपयानी कमी झाले आहेत. आगामी काळात या दरात आरखी 3 ते 4 रुपयाची घट होणार असल्याचे व्यापाऱ्यांनी सांगितले. केंद्र सरकारने खाद्य तेलावरील आयात शुल्क कमी केले आहे. त्याचबरोबर देशातील खाद्यतेलाचे उत्पादन वाढत असल्यामुळे खाद्यतेलाचे दर कमी होण्यास मदत झाली आहे. जागतीक पातळीवरही दरम्यानच्या काळात खाद्यतेलाचे दर कमी झाले असल्याचे व्यापाऱ्यांनी सांगितले.
तेल उत्पादकांच्या संघटनेचे अध्यक्ष अतुल चतुर्वेदी यांनी सांगितले की, या अगोदर जागतीक पातळीवर तेलाचे दर वाढल्यामुळे देशात तेलाचे दर मोठ्या वाढले होते. त्यामुळे ग्राहकांबरोबरच तेलाच्या व्यापाऱ्यांत कमालीची अस्वस्थता निर्माण झाली होती. मात्र केंद्र सरकारने वेळीच हस्तक्षेप करुन आयात शुल्क कमी केल्यामुळे ग्राहकांना वेळीच दिलासा मिळाला.
त्यामुळे गेल्या 30 दिवसात तेलाचे दर 8 ते 10 रुपयानी कमी होण्यास मदत झाली आहे. ज्या प्रमाणात आयात शुल्क कमी झाले आहे, त्या प्रमाणात तेलाचे दर कमी करण्याचा निर्णय व्यापऱ्यानी घेतल्यामुळे कमी वेळात तेलाचे दर उतरले आहेत. आगामी काळताही ते कमी होण्याची शक्यता आहे.
आता भारतात तब्बल 120 लाख टन ईतके सोयाबीनचे उत्पादन झाले आहे. त्याचबरोबर 80 लाख टन शेंगदाण्याचे उत्पादन झाले आहे. त्यामुळे भारतात खाद्यतेलाचे दर नियंत्रणात राहण्याची शक्यता आहे. मोहरीचे उत्पादना वाढले असून 10 लाख टानापर्यंत मोहरी उपलब्ध होणार आहे. त्यातच जागतीक बाजारातही खाद्येतल उत्पादन वाढण्याचे संकेत मिळत आहेत. त्यामुळे खाद्यतेलाच्या बाबतीत सकारात्मक परिस्थिती निर्माण झाली आहे. भारताला वर्षाला 22 दशलक्ष टन खाद्यतेल लागते. त्यातील 65 टक्के म्हणजे 15 दशलक्ष टन खाद्यतेलाची आयता करावी लागते. गेल्या दोन वर्षात करोनामुळे खाद्यतेलाची आयात कमी झाली. त्याचबरोबर जागतीक बाजारात तेलाचे दर वाढले होते.