G Kishan Reddy : तेलंगणा विधानसभा निवडणुकीत भाजपला अपेक्षेएवढ्या जागा मिळाल्या नाहीत, मात्र गेल्या निवडणुकीपेक्षा यावेळी पक्षाने चांगली कामगिरी केली आहे. यावेळी त्यांनी 8 जागा जिंकल्या आहेत, तर गेल्या वेळी त्यांना केवळ 1 जागा मिळाली होती. या कामगिरीने भारतीय जनता पक्ष खूपच उत्साहित आहे. त्यामुळे पक्षाने आता लोकसभा निवडणुकीत याठिकाणी सर्व जागांवर एकट्याने लढण्याचा निर्णय घेतला असल्याचे सांगण्यात येत आहे.
भाजप अध्यक्ष जी किशन रेड्डी यांनी स्पष्ट केले की, पक्ष 2024 ची लोकसभा निवडणूक एकटाच लढवेल. भाजपच्या पदाधिकाऱ्यांसोबत झालेल्या बैठकीत त्यांनी ही माहिती दिली. या बैठकीला भाजपचे राष्ट्रीय सरचिटणीस तरुण चुगही उपस्थित होते. नुकत्याच झालेल्या तेलंगणा विधानसभा निवडणुकीत काँग्रेसच्या विजयानंतर भाजप 2024 च्या सार्वत्रिक निवडणुकांसाठी भारत राष्ट्र समिती (BRS) सोबत हातमिळवणी करेल अशी अटकळ बांधली जात होती. भाजप प्रदेशाध्यक्षांनी अशा अटकळांना तूर्तास पूर्णविराम दिला आहे.
विधानसभा निवडणुकीत भाजपने जनसेना पक्षाला नऊ जागांवर पाठिंबा दिला होता. रेड्डी यांनी पक्षाच्या कार्यकर्त्यांना लोकसभा निवडणुकीसाठी तयार राहण्यास सांगितले आणि भाजपच्या विजयाबाबत विश्वास व्यक्त केला. ते म्हणाले की, भाजप, काँग्रेस आणि बीआरएसमध्ये तिरंगी लढत होणार आहे. पक्षाध्यक्षांनी विधानसभा निवडणुकीत त्यांच्या जागांची संख्या वाढवल्याबद्दल कार्यकर्त्यांचे अभिनंदन केले आणि लोकसभा निवडणुकीपर्यंत लढण्याची भावना कायम ठेवण्यास प्रोत्साहित केले.
यानंतर हैदराबाद येथील प्रदेश भाजप कार्यालयात आयोजित विकास भारत संकल्प यात्रेच्या तयारी कार्यक्रमातही रेड्डी सहभागी झाले होते. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील केंद्र सरकारच्या कल्याणकारी योजना आणि विकास तेलंगणातील लोकांपर्यंत पोहोचवणे हा या कार्यक्रमाचा उद्देश आहे. या यात्रेत केंद्रीय योजनांच्या लाभार्थींचा समावेश करण्याबरोबरच ज्यांना पात्र असूनही अद्याप कार्यक्रमांचा लाभ मिळालेला नाही अशा लोकांचीही नोंदणी केली जाणार आहे.