मिझोराम – इंधन दरवाढीमुळे देशातील नागरिक मेटाकुटीला आले असतानाच मिझोराममध्ये एक नवा पेच उद्भवला आहे. गेल्या काही दिवसांपासून आसाम आणि मिझोराम या दोन राज्यांमध्ये संघर्ष निर्माण झाला आहे. त्यामुळे आसाम आणि मिझोराममधील राष्ट्रीय महामार्गावरील वाहतूक ठप्प झाली आहे.
मिझोरामला जाण्यासाठीचा राष्ट्रीय महामार्ग आसाममधून जातो. मात्र, संघर्षामुळे ही वाहतूक ठप्प झाली आहे. परिणामी इंधनाचे टँकर मिझोराममध्ये पोहोचू शकत नाहीत. त्यामुळे मिझोराममध्ये इंधनाची प्रचंड टंचाई निर्माण झाली आहे. या पार्श्वभूमीवर मिझोराम सरकारने राज्यातील सर्व पेट्रोल पंपचालकांना महत्त्वपूर्ण निर्देश दिले आहेत.
त्यानुसार प्रत्येक वाहनासाठी इंधनाची मर्यादा ठरवून देण्यात आली आहे. त्यामुळे दुचाकीस्वारांना 5 लीटर आणि चारचाकी वाहनांना फक्त 10 लीटर इंधन मिळत आहे. तर सहा, आठ आणि बारा चाकांच्या अवजड वाहनांना एकावेळी 50 लीटर आणि पिकअप ट्रक्सना एकावेळी फक्त 20 लीटर इंधनाची मर्यादा आखून देण्यात आली आहे.