भारतरत्न स्वरसम्राज्ञी गानकोकिळा लता मंगेशकर यांच्या निधनामुळे कोट्यवधी भारतीयांसह जगभरातील अब्जावधी चाहत्यांचे डोळे अश्रूंनी डबडबले नसतील, तरच नवल. 1960 च्या दशकामध्ये चीनच्या युद्धानंतर सैनिकांना उद्देशून लता मंगेशकर यांनी जे अजरामर गाणे गायले होते, ते गाणे गायल्यानंतर समोर उपस्थित असलेले पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू यांच्या डोळ्यांतसुद्धा पाणी आले होते. आज तशीच काहीशी अवस्था तमाम भारतीयांची आणि लता मंगेशकर यांच्या चाहत्यांची असणार आहे. गेले काही दिवस लता मंगेशकर आजारी असल्यामुळे आणि त्यांची प्रकृती दिवसेंदिवस बिघडत असल्यामुळे या स्वरूपातली बातमी येऊ नये अशी तमाम भारतीयांची इच्छा होती; पण अखेर ती बातमी आलीच आणि संपूर्ण संगीत सृष्टी निःशब्द आणि स्तब्ध झाली. जगाच्या कानाकोपऱ्यात कोठे ना कोठे सतत ऐकला जाणारा सूर म्हणून लता मंगेशकर यांच्या आवाजाचे वर्णन केले जाते.
भारतातील हजारांच्यावर आकाशवाणी केंद्र असोत किंवा जगाच्या पाठीवर असणारी विविध प्रकारची रेडिओ केंद्र असोत प्रत्येक ठिकाणी हा दैवी स्वर नेहमीच गुंजत असतो. लता मंगेशकर यांनी एका गाण्यात म्हटल्याप्रमाणे “मेरी आवाज ही मेरी पहचान है’ या धर्तीवर त्यांचा आवाज यापुढेही अशाच प्रकारे गुंजत राहणार आहे. लता मंगेशकर यांनी गेल्या सत्तर-ऐंशी वर्षांच्या कालावधीत संगीत सृष्टीतील बदल आणि ट्रेंड याची दखल घेतली असल्यानेच कोणत्याही कालावधीत यशस्वी होण्याचे गमक त्यांना सापडले होते. खरे तर लता मंगेशकर यांची सुरुवातीची कारकीर्द अतिशय कष्टाची होती. वयाच्या अवघ्या तेराव्या वर्षी पित्याचे छत्र हरपल्यानंतर संपूर्ण कुटुंबाची जबाबदारी अंगावर आल्यानंतरही त्यांना चित्रपट सृष्टीत जाऊन जम बसवण्यासाठी बरेच प्रयत्न करावे लागले. पहिल्या चित्रपटासाठी त्यांनी जे गाणे गायले होते ते चित्रपटातून वगळण्यात आले होते. एवढेच नाही तर तेव्हा अनेक संगीतकारांनी लता मंगेशकर यांचा आवाज अतिशय पातळ असून तो पार्श्वगायनासाठी योग्य नाही, असे सांगून त्यांची बोळवण केली होती.
पण संगीतकार गुलाम हैदर यांनी मात्र तेव्हा संगीतकार एक ना एक दिवस लता मंगेशकर यांचे पाय धरतील अशी भविष्यवाणी केली होती, तीच खरी ठरली. 1949 च्या “महल’ चित्रपटातील “आये गा आनेवाला’ या गाण्याने लता मंगेशकर यांचे हिंदी चित्रपट क्षेत्रातील स्थान पक्के केले. खरे तर त्या कालावधीत नूरजहॉंसारख्या गायिकांचा उडता आणि चढता आवाज लोकप्रिय होता. बहुतेक गायिका एखाद्या सांगीतिक मैफिलीप्रमाणे पडद्यावरील चित्रपटासाठीही गायन करत असत; पण लता मंगेशकर यांनीच काळाची पावले ओळखून मैफिलीच्या पद्धतीचे गायन बाजूला सारून पडद्यावर नायिका कोण आहे, याचा विचार करून आपल्या आवाजाचा वापर केला. त्यामुळे 1950 नंतर हिंदी चित्रपटसृष्टीच्या पार्श्वगायन क्षेत्रामध्ये फक्त लता मंगेशकर यांचेच राज्य राहिले. लतादीदींवर मराठी संस्कार असल्यामुळे त्यांचे उच्चारही मराठी पद्धतीचे होते. त्याबाबत एकदा अभिनेता दिलीप कुमार यांनी सौम्य शब्दात टीका केल्यानंतर लता मंगेशकर यांनी मनावर घेतले आणि उर्दूचे शिक्षण घेण्यासाठी खास शिक्षकाची नियुक्ती केली होती.
त्यानंतर कधीही त्यांच्या उच्चाराबाबत कोणीही आक्षेप घेतला नव्हता. प्रारंभीच्या काळात संघर्षाला तोंड द्यावे लागले असल्यामुळे नंतरच्या काळातही लता मंगेशकर यांची नेहमीच संघर्षाची आणि आपल्या हक्कासाठी झगडण्याची भूमिका राहिली होती. ज्या काळामध्ये संगीतकारांचा चित्रपटसृष्टीवर वरचष्मा होता त्या काळामध्ये गायकांना अनेक वेळा दुय्यम वागणूक दिली जात असे. रॉयल्टीचे पैसेसुद्धा गायकांना न देता ते संगीतकारांना मिळत असत. अशा कालावधीमध्ये लता मंगेशकर यांनी पुढाकार घेऊन रॉयल्टीमध्ये काही प्रमाणात गायकांचासुद्धा वाटा असावा, अशी मागणी केली होती. या मागणीला त्या काळातील मोहम्मद रफी यांच्यासारख्या अनेक गायकांनी विरोध केला होता. त्यावरून लता मंगेशकर आणि मोहम्मद रफी यांच्यामध्ये दीर्घकाळ अबोला होता. तरीसुद्धा लता मंगेशकर यांनी आपली भूमिका कायम ठेवली आणि गायकांना न्याय मिळवून दिला होता. अशाच प्रकारे तत्त्वाचा आग्रह धरल्यामुळे त्यांनी दीर्घकाळ सचिन देव बर्मन यांच्याकडेसुद्धा गायन केले नव्हते. गायक कलाकारांच्या या हक्कांची जाणीव असतानाच त्यांना आपल्या क्षेत्रातील इतर गायकांना प्रोत्साहन मिळावे असेच वाटत होते म्हणून 1969 नंतर त्यांनी फिल्मफेअर पुरस्कार स्वीकारणे बंद केले होते.
या क्षेत्रात नव्याने येणाऱ्या गायक-गायकांना संधी मिळावी या एकाच हेतूने त्यांनी पुरस्कार स्वीकारण्यास नकार दिला होता. आणखी एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे साऱ्या जगासाठी लतादीदी भारताचे प्रतिनिधित्व करत असल्या तरी आपल्यासाठी महाराष्ट्र कन्या होती. त्यांनी गायलेली अनेक मराठी गाणी जास्त श्रवणीय आहेत, अशी कबुली अनेक संगीत तज्ज्ञही देतात. भक्ती संगीत क्षेत्रात भक्ती रसाचा वापर करून संत ज्ञानेश्वर, संत तुकाराम यांसारख्या संतांचे काव्य गायन रूपात सादर करण्याचे श्रेय लता मंगेशकर यांना जाते. एवढेच नव्हे तर महाराष्ट्रातील जे प्रख्यात कवी होते त्या कवींच्या अवघड शब्दांनासुद्धा हृदयनाथ मंगेशकर यांनी चाली देऊन लता मंगेशकर यांच्याकडून ती अवघड गाणी गाऊन घेतली आहेत. ती गाणीही अजरामर झाली आहेत. मराठीच नाही तर भारतातील 36 भाषांमध्ये आणि अनेक परदेशी भाषांमध्येसुद्धा लता मंगेशकर यांनी गाणी सादर केली आहेत. लंडनच्या अल्बर्ट हॉलमध्ये गायन सादर करणारी पहिली भारतीय कलाकार म्हणून लतादीदी यांचेच नाव घेतले जाते.
चित्रपटातील गाण्यासाठी त्यांना तब्बल पंधरा वेळा पुरस्कार मिळाले आहेत. 1950 ते 1960 च्या दशकातील सी रामचंद्र, शंकर-जयकिशन, रोशन, जयदेव, मदन मोहन, एस. डी. बर्मन, लक्ष्मीकांत-प्यारेलाल यांसारख्या संगीतकारांबरोबर काम करणाऱ्या लतादीदींनी नंतरच्या काळातील आनंद-मिलिंद, नदीम-श्रवण, अनु मलिक, ए. आर. रहमान अशा नव्या संगीतकारांबरोबरसुद्धा काम केले होते. पडद्यावरील एखादे गूढरम्य गाणे असो किंवा प्रेमगीत असो किंवा देशभक्तीपर गीत असो त्या परिस्थितीप्रमाणे आपला आवाज वळवण्याचे कौशल्य लता मंगेशकर यांच्याकडे असल्यामुळेच आजही ती गाणी समाजातील सर्व घटकांमध्ये आणि वयोगटांमध्ये लोकप्रिय ठरली आहेत. साहजिकच लता मंगेशकर यांच्या निधनामुळे तात्पुरता जरी हा स्वर निःशब्द आणि शांत झाला असला तरी त्यांच्या हजारो गाण्यांच्या माध्यमातून हा स्वर यापुढेही कायमच गुंजत राहणार आहे यात शंका नाही. आपल्या दैवी सुराने हजारो रसिकांच्या मनावर राज्य करणाऱ्या या महान गायिकेला आणि गानसरस्वतीला श्रद्धांजली.