नवी दिल्ली – अमेरिकेतील उच्च पातळीवरील व्याजदर आणि इतर कारणामुळे गेल्या काही महिन्यापासून भारतातील शेअर बाजारात परदेशी गुंतवणूक कमी होत होती. तर भारतातील कर्जरोखे बाजारात परकीय गुंतवणूक वाढत हाती. मात्र मार्च महिन्याच्या पहिल्या आठवड्यात परदेशी गुंतवणूकदारांनी शेअर बाजारात 40,710 कोटी रुपयांची गुंतवणूक केल्याची आकडेवारी समोर आली आहे. (FPIs infuse over Rs 40,000 cr in Indian equities on strong economic growth)
भारतातील स्थूल अर्थव्यवस्था मजबूत असल्याची आकडेवारी समोर येत आहे. प्रत्यक्ष आणि अप्रत्यक्ष कर संकलन वाढले आहे. चालू खात्यावरील तूट आटोक्यात आहे. केंद्र सरकारने आपली तूट यावर्षी ठरविलेल्या मर्यादेत राखण्याचा संकल्प केला आहे.
एकीकडे स्थूल अर्थव्यवस्था बळकट असतानाच भारतातील कंपन्यांनी चांगले ताळेबंद जाहीर केले आहेत. आता जागतिक पातळीवर व्याजदर कपातीबाबत चर्चा सुरू आहे. अशा परिस्थितीत परदेशी गुंतवणूकदार पुन्हा भारतीय शेअर बाजाराकडे वळू लागले असल्याचे वातावरण आहे.
जानेवारी महिन्यात परदेशी गुंतवणूकदारांनी भारतीय शेअर बाजारातून 25,743 कोटी रुपयांची गुंतवणूक काढून घेतली होती. त्यानंतर परिस्थितीत काही प्रमाणात सुधारणा झाल्याने फेब्रुवारीमध्ये या गुंतवणूकदारांनी केवळ 1,539 कोटी रुपयांची गुंतवणूक भारतीय शेअर बाजारात केली होती. मात्र मार्च महिन्यात आतापर्यंत या गुंतवणूकदारांनी भारतीय शेअर बाजारात बरीच खरेदी केली असल्याचे दिसून येत आहे.
अमेरिकेच्या कर्जरोख्यावरील परतावा आता कमी होऊ लागला आहे. त्यामुळे परदेशी गुंतवणूकदारांना भारतीय शेअर बाजार आकर्षक वाटत आहे. असे जिओजित वित्तीय सेवा या संस्थेचे विश्लेषक विखे विजयकुमार यांनी सांगितले ते म्हणाले की, जर अमेरिकेने व्याजदरात लवकर कपात केली तर भारतात परदेशी गुंतवणूक वाढण्यास मदत होणार आहे.
केवळ भारतीय शेअर बाजारात परदेशी गुंतवणूकदार गुंतवणूक करणार नाहीत तर भारतीय रोखे बाजारातही हे गुंतवणूकदार मोठ्या प्रमाणात गुंतवणूक करण्याची शक्यता आहे. या अगोदर विविध पतमानांकन संस्थेच्या यादीवर भारतीय कर्जरोखे नव्हते. आता काही पतमानांकन संस्थांनी त्यांच्या यादीवर भारतीय कर्जरोख्याचा समावेश केला आहे.
परदेशी गुंतवणूकदारांना भारतीय कर्जरोख्यात गुंतवणूक करता येऊ शकणार आहे. यामुळे सकारात्मक वातावरण निर्मिती होईल. भारतातील कंपन्यांनाही कर्जरोख्यांच्या माध्यमातून परदेशातून गुंतवणूक कमी व्याजदरावर उपलब्ध होऊ शकेल असे समजले जाऊ लागले आहे.