नवी दिल्ली – मे 2021 च्या सुमारास भारतामध्ये करोनाची दुसरी लाट आल्यामुळे अर्थव्यवस्थेवर बराच परिणाम झाला आहे. त्यामुळे आशियाई विकास बॅंकेने या वर्षाच्या भारताचा विकास दर अंदाजात काही प्रमाणात घट केली आहे.
अगोदर बॅंकेने भारताचा विकास दर 11 टक्के राहील असे म्हटले होते. मात्र आता त्यात सुधारणा करून भारताचा या वर्षाचा विकास दर दहा टक्के राहील असे बॅंकेने जाहीर केलेल्या पत्रकात म्हटले आहे. पहिल्या तिमाहीत दिवाळीमध्ये विकास दर कमी झाला असला तरी आगामी काळात परिस्थिती वेगाने सुधारणार आहे.
त्यामुळे एकूण वर्षाचा विकास दर दहा टक्के राहील असे या बॅंकेला वाटते. पुढच्या वर्षी भारताचा विकास दर साडेसात टक्के राहील असा अंदाज बॅंकेने व्यक्त केला आहे. भारत सरकारने या वर्षी पायाभूत सुविधावर खर्च वाढविण्याचे ठरविले आहे. त्याचबरोबर निर्यात आघाडीवर समाधानकारक परिस्थिती असल्यामुळे विकास दर दहा टक्के होणार आहे.
मात्र ग्राहकांकडून आणखी मागणी आलेली नाही. ही मागणी वाढण्यास बराच काळ लागेल असे बॅंकेला वाटते. चीन वगळता इतर आशिया देशातील विकास दर फारसे वाढणार नसल्याचे बॅंकेने सांगितले.
चीनमध्ये देशांतर्गत मागणी वाढू लागल्यामुळे चीनचा विकासदर सुरुवातीपासूनच सकारात्मक पातळीवर आहे. बॅंकेने म्हटले आहे की 2021 मध्ये चीनचा विकास दर 8.1 टक्के राहील. तर पुढच्या वर्षी हा विकास दर साडेपाच टक्के राहणार आहे. चीनला देशांतर्गत मदत मिळत असली तरी या निर्यात आघाडीवर थोडा परिणाम झाला असल्याचे बॅंकेने म्हटले आहे.