उत्तरकाशी (उत्तराखंड) – येथील गंगोत्री राष्ट्रीय महामार्गावरील गंगनानी पुलाजवळ मुसळधार पावसामुळे झालेल्या भूस्खलनात तीन वाहने गाडली गेल्याने मध्य प्रदेशातील चार यात्रेकरूंचा मृत्यू झाला आणि सात जण जखमी झाले.
पुलाजवळील डोंगरावरून दरड कोसळल्याने वाहने ढिगाऱ्याखाली आल्याची घटना सोमवारी रात्री घडली.उत्तराखंडचे मुख्यमंत्री पुष्कर सिंह धामी यांनी या दुर्घटनेबद्दल दु:ख व्यक्त केले आणि लोकांनी अतिवृष्टीदरम्यान अनावश्यक प्रवास टाळण्याचे आवाहन केले.चारपैकी तीन मृतदेह बाहेर काढण्यात आले असून चौथ्या मृतदेहाला ढिगाऱ्यातून बाहेर काढण्याचे प्रयत्न सुरू आहेत, असे भटवाडीचे उपजिल्हाधिकारी चतरसिंग चौहान यांनी सांगितले.
जखमी झालेल्या सात जणांपैकी दोघांची प्रकृती गंभीर असल्याचे त्यांनी सांगितले.माहिती मिळताच पोलीस आणि राज्य आपत्ती प्रतिसाद दलाचे पथक मदत आणि बचाव कार्यासाठी घटनास्थळी पोहोचले. स्थानिक लोक आणि बॉर्डर रोड ऑर्गनायझेशनचे कर्मचारीही मदतकार्यात सामील झाले.