सासवड -पुरंदर तालुक्यातील 29 ग्रामपंचायतींचा कार्यकाळ गुरुवारी (दि. 20) संपला आहे. या सर्व ग्रामपंचायतींवर शुक्रवार (दि. 21) ऑगस्टपासून प्रशासक नेमणूक करण्याचा निर्णय पुणे जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी आयुष प्रसाद यांनी घेतला आहे. पुरंदर तालुक्यातील 4 विस्तार अधिकाऱ्यांवर तब्बल 29 ग्रामपंचायतीचा गावगाडा हाकण्याची जबाबदारी देण्यात आली आहे. त्यामुळे या अधिकाऱ्यांना मोठी कसरत करावी लागणार आहे.
पुरंदर पंचायत समितीचे विस्तार अधिकारी एस. के. कुंभार यांच्याकडे कोडीतखुर्द, थोपेवारवडी, हिवरे, शिवरी, काळदरी, गराडे, दिवे गावांचा पदभार देण्यात आला आहे. विस्तार अधिकारी पी. एम. बगाडे यांना मांढर, केतकावळे, जवळार्जुन, धालेवाडी, नाझरे क.प, परींचे गावांचा पदभार दिला आहे. कृषी विभागाचे विस्तार अधिकारी एन. डी. गायकवाड यांच्याकडे लपतळवाडी, टेकवडी, पिंगोरी, नायगाव, साकुर्डे, जेऊर, निरा-शिवतक्रार आदी गावांचा पदभार देण्यात आला आहे. कृषी विभाग विस्तार अधिकारी श्रीमती पी. व्ही. जगताप यांना कुंभारवळण, हरगुडे, वाघापूर, गुऱ्होळी, आंबळे, खळद, भिवडी येथील जबाबदारी देण्यात आली आहे.
नैसर्गिक आपत्ती, आणीबाणी, वित्तीय आणीबाणी, प्रशासकीय अडचणी व महामारीमुळे राज्य निवडणूक आयोगाच्या वेळापत्रकानुसार निवडणुका घेणे शक्य नसल्याने तर राज्यशासन राजपत्रातील अधिसूचनेद्वारे अशा पंचायतीचा प्रशासक म्हणून योग्य व्यक्तीची नियुक्ती करण्याबाबत आदेश दिले होते. त्यानुसार अधिकाराचा वापर करून मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद पुणे यांनी पुरंदर तालुक्यातील 20 ऑगस्ट रोजी मुदत संपणाऱ्या 29 ग्रामपंचायतींवर प्रशासकांची नियुक्ती केली आहे.