नगर – उन्हाळ्याची सुट्टी संपल्यानंतर 15 जूनपासून शाळा सुरू होणार असून शाळेच्या पहिल्याच दिवशी विद्यार्थ्यांना पाठ्यपुस्तकाचे वाटप करण्यात येते. त्यानुसार जिल्ह्यात तब्बल चार लाख 53 हजार 879 विद्यार्थ्यांना शाळेच्या पहिल्याच दिवशी पाठपुस्तके मिळण्याची व्यवस्था शिक्षण विभागाकडून करण्यात आली आहे.
जिल्हा परिषदेच्या शाळांसह अनुदानित शाळांमधील पहिली ते आठवीपर्यंत सर्व विद्यार्थ्यांना पाठपुस्तकांचे वाटप करण्यात येते. त्यानुसार जिल्हा परिषदेच्या शिक्षण विभागाकडून नियोजन करण्यात आले आहे. समाजकल्याण, आदिवासी विकास, सेंट्रल स्कूल, नवोदय, जिल्हा परिषद, नगरपालिका, महापालिका, कटक मंडळ, तसेच शासन अनुदानित, अंशत: अनुदानित शाळांमध्ये शिक्षण घेणाऱ्या पहिली ते आठवीपर्यंतच्या सर्व विद्यार्थ्यांना मोफत पाठ्यपुस्तकांचे वाटप दरवर्षी करण्यात येते.
यानुसार जिल्ह्यातील 4 लाख 53 हजार 879 विद्यार्थ्यांना पुस्तके मिळावीत, अशी मागणी जिल्हा परिषदेच्या शिक्षण विभागाने राज्य सरकारच्या बालभारती विभागाकडे केली आहे. मागणी केलेली पुस्तके शिक्षण विभागाकडे उपलब्ध झाल्यानंतर ही पुस्तके तालुकास्तरावरील गटशिक्षण अधिकाऱ्यांकडे देण्यात येतील.
तेथून केंद्रप्रमुख तसेच मुख्याध्यापकांकडे पुस्तके पोहोचविण्यात येणार असून, विद्यार्थ्यांना सर्व पुस्तके शाळेच्या पहिल्याच दिवशी देण्यात येणार आहेत. जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी आशिष येरेकर व शिक्षणाधिकारी भास्करराव पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली याचे नियोजन करण्यात येत आहे.