मुंबई, – पीएमसी बॅंक घोटाळा प्रकरणातील मुख्य आरोपी आणि बॅंकेचे माजी संचालक दलजीतसिंग बल यांच्या मुंबई पोलिसांच्या आर्थिक गुन्हे शाखेने अखेर मुसक्या आवळल्या आहेत.बिहारमधील पूर्व चंपारण जिल्ह्यातील रक्सौल सीमेजवळ त्यांना अटक करण्यात आली आहे. देशाबाहेर पळून जाण्याच्या तयारीत असतानाच ही कारवाई करण्यात आली.
याप्रकरणी मुंबई पोलिसांची आर्थिक गुन्हे शाखा तपास करत आहे. दलजीतसिंग बल हे पीएमसी बॅंकेचे माजी संचालक असून 4 हजार 355 कोटींच्या घोटाळ्यात मुख्य आरोपी आहे. गेल्या काही महिन्यांपासून मुंबई पोलिसांची आर्थिक गुन्हे शाखा त्यांच्या मागावर होती. त्यांच्याविरुद्ध लूकआऊट नोटीसही जारी करण्यात आली होती.
अखेर देश सोडून जाण्याच्या तयारीत असतानाच ते कचाट्यात सापडले. नेपाळच्या हद्दीपासून अवघ्या 200 मीटर अंतरावर इमिग्रेशन विभागाने कारवाई करत दलजीत यांना ताब्यात घेतले.
दरम्यान, पीएमसी बॅंक घोटाळा 2019मध्ये उघडकीस आला होता. गेल्या अनेक महिन्यांपासून पोलीस दलजीतसिंग बल यांच्या मागावर होते. दलजीत सातत्याने पोलिसांना गुंगारा देत होता. याबाबत सर्व यंत्रणांनाही अलर्ट करण्यात आले होते. दरम्यान, नीरव मोदी, विजय मल्ल्याप्रमाणेच दलजीतही देश सोडून नेपाळमार्गे कॅनडात जाण्याच्या बेतात असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. ही माहिती तातडीने सर्व संबंधितांना देण्यात आली. त्यामुळेच नेपाळ सीमेपर्यंत पोहचलेला दलजीत यांना पकडण्यात यश आले.