मुंबई – शेकापचे रायगड जिल्हातील पेण मतदारसंघाचे माजी आमदार धैर्यशील पाटील यांनी भाजपात प्रवेश केला आहे. मुंबईच्या भाजप प्रदेश कार्यालयात त्यांचा प्रवेश झाला, यावेळी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह, प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे हे उपस्थित होते. त्यांच्या प्रवेशानंतर पाटील यांचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी कौतुक केले आहे.
धैर्यशील पाटील हे चांगले वक्ते आहेत, तसेच प्रत्येक गोष्टीचा ते सखोल अभ्यास करतात. मी मुख्यमंत्री असताना अनेक प्रश्न घेऊन माझ्याकडे ते यायचे. जनतेत राहून जनतेची कामांसंदर्भात त्यांचे सातत्य महत्त्वाचे आहे. त्यांच्या प्रवेशाचा आम्हाला आनंद आहे, असे फडणवीस यांनी यावेळी म्हटले आहे.
पाटील यांनी कायमच समाजाभिमुख राजकारण करताना तळगाळातील लोकांच्या प्रश्नांसाठी लढा दिला आहे. त्यामुळे पाटील यांनी पक्ष बदलला असला तरीही त्यांचा विचार बदललेला नाही. त्यांनी जो निर्णय घेतला त्याबद्दल मी त्यांचेव मी स्वागत करतो, असेही देवेंद्र फडणवीस यांनी म्हटले आहे. पाटील यांच्यापूर्वी, रायगड पालीमधल्या राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या गीता पालरेचा आणि शेकापचे दिलीप भोईर यांनी भाजपात प्रवेश केलेला आहे.