वाघोली – संतुलन संचलित सासू-सून महिला बचत गटाच्या पंचवार्षिक सोहळ्या निमित्त संतुलन भवन तुळजाभवानीनगर येथे दीडशे महिलांना ज्ञानेश्वरी ग्रंथ,धान्य कीट व बचत निधीचे महिला आनंद मेळाव्यात वाटप करण्यात आले. कार्यक्रमाची सुरुवात संतुलन निवासी पाषाण शाळेतील विद्यार्थ्यांनी स्वागत गीत व गणेश वंदनाचे गायन करून मान्यवरांचे स्वागत केले. कार्यक्रमाचे उद्घाटन माजी आमदार बापूसाहेब पठारे यांच्या हस्ते दीपप्रज्वलन व ज्ञानेश्वरी अभ्यासक प्रवचनकार माऊली कन्या दिपालीताई यांच्या हस्ते ग्रंथाचे पूजन करून करण्यात आले.
कार्यक्रमाच्या प्रास्ताविकेत सासू –सून महिला बचत गटाच्या सचिव निर्मलाताई धुमाळ यांनी दीडशे महिलांच्या बचत गटाचा पंचवार्षिक अहवाल सादर केला. प्रत्येक सदस्याला बारा हजार बचत व सहा हजार व्याज रक्कम अदा करण्यात आली. तसेच पाच वर्षात साठ लाख छत्तीस हजार रुपयांचे कर्ज महिलांनी स्वयंरोजगार, घर बांधणी, शिक्षण, आरोग्य, अत्यावश्यक गरजा, इत्यादी कारणासाठी घेवून सावकारकी नष्ट केली असल्याचे मत मांडले.
बचत गटांच्या माध्यमातून महाराष्ट्र, उत्तरप्रदेश व उत्तराखंड राज्यातील महिलांना आर्थिक, सामाजिक, राजकीय व सांस्कृतिक दृष्ट्या सक्षम करण्यासाठी संतुलन संस्थेने गेली वीस वर्षात हजारो गट निर्माण करून लाखो महिलांना सावकारकी, निरक्षरता, अंधश्रद्धा व शोषणापासून मुक्त केले आहे. संतुलन महिला पतसंस्थेच्या माध्यमातून बचत गटांना मुबलक प्रमाणात व अल्प दरात कर्ज उपलब्ध करून दिले आहे. महिलांनी मुलगी जन्माला येताच तिच्या नावाने कन्या कल्याण खाते खोलावीत व तिच्या संपूर्ण शिक्षणासाठी लागणाऱ्या सर्व खर्चातून पालकांनी चिंतामुक्त होण्याचे आवाहन पल्लवी रेगे यांनी केले.
संतुलन संस्थेच्या स्थापनेपासून निकटचे संबंध असून संस्थेचे कार्य निश्चितच गौरवास्पद व विश्वास पूर्ण असल्याने संतुलन संस्थेच्या शहरी भागातील बचत गटातील महिलांना स्वयंरोजगारासाठी महानगरपालिकेचे सभागृह उपलब्ध करून देण्याचे आश्वासन माजी आमदार बापूसाहेब पठारे यांनी उद्घाटन प्रसंगी दिले.
ज्ञानेश्वरीचे मानवी जीवनातील महत्व विषद करतांना ‘वाचावी ज्ञानेश्वरी ..डोळा पहावी पंढरी. या अभंगाचा आधार घेवून आध्यत्म व सामाजिक प्रश्न यावर माऊली कन्या दिपालीताई यांनी प्रवचन सादर केले.
बचत गटांच्या अध्यक्षा संगीता चौधरी, सुप्रिया मोडक, कांचन ओव्हाळ, रीमा जाधव, प्रियंका निकम, निर्मला बोरकर इत्यादीं महिलांनी मनोगते मांडली. बी.एम रेगे यांनी पाहुण्यांचा परिचय व सत्कार केला. संतुलन अध्यक्षा वंदनाताई भुजबळ,लीलाताई जाधव,पुष्पा जगताप,शीलाताई काळे, बाळासाहेब धुमाळ, बाळासाहेब रासकर आदी उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन आदिनाथ चांदणे व संयोजन राजेंद्र राठोड, सारा ,उर्मिला काची,किरण गाडे,निखील गायकवाड आदींनी केले.