भारतामध्ये जून महिना हा जसा शैक्षणिक वर्षाच्या प्रारंभाचा महिना म्हणून ओळखला जातो तसाच तो पाऊस सुरू होण्याचा महिना म्हणूनही ओळखला जातो. भारतीय पंचांगाप्रमाणे दरवर्षी सात जूनला मृग नक्षत्राच्या पार्श्वभूमीवर पावसाचे आगमन होते, असे मानले जाते. अर्थात, गेल्या काही वर्षांमध्ये पावसाने कधीच सात जूनचा मुहूर्त गाठलेला नाही हे वास्तव आहे. यावर्षीही मृग नक्षत्राच्या पावसाचा शिडकावा भारताच्या भूमीवर झालेला नाही. भारतीय हवामान खात्याच्या ताज्या अंदाजाप्रमाणे, केरळमध्ये येत्या दोन ते तीन दिवसांमध्ये म्हणजे 10 जूनपर्यंत मान्सूनचे आगमन होईल. त्यानंतर काही दिवसांनी हा मान्सून देशाच्या इतर भागांमध्ये विशेषत: महाराष्ट्र, कर्नाटक, गोवा या राज्यांमध्ये पोहोचेल. आतापर्यंतचा हवामानविषयक इतिहास पाहता दरवर्षी साधारण 20 मेच्या आसपास मान्सूनचे अंदमानात आगमन होते. त्यानंतर साधारण मेच्या अखेरीस किंवा जूनच्या पहिल्या आठवड्यात मान्सून केरळमध्ये येतो आणि त्यानंतर तो पुढे सरकत जातो. मान्सूनच्या या आजवरच्या वेळापत्रकाप्रमाणेच शेतीची आणि इतर सर्व काही कामे आखली जातात. पण यावर्षी अजूनही केरळमध्येच मान्सूनचे आगमन न झाल्याने मान्सून लांबणार अशीच परिस्थिती दिसत आहे.
अरबी समुद्रामध्ये कमी दाबाचा पट्टा निर्माण झाल्याने “बिपरजॉय’ नावाचे एक चक्रीवादळ येत्या दोन ते तीन दिवसांमध्ये किनारपट्टीला धडकेल, असाही एक अंदाज व्यक्त करण्यात आला आहे. या चक्रीवादळापासून भारतीय किनारपट्टीला फारसा धोका नसला तरी या चक्रीवादळामुळेच मान्सूनचे आगमन आणि मान्सूनचा प्रवास मंदावला आहे, असे हवामान शास्त्रज्ञांना वाटते. गेल्या तीन महिन्यांत भारतीय हवामान खाते असो किंवा स्कायमेट ही खासगी हवामान संस्था असो त्यांनी यावर्षी भारतामध्ये सर्वसाधारण म्हणजे सुमारे 96 टक्के मान्सून येईल, असा अंदाज व्यक्त केला होता. गेल्या काही वर्षांचा इतिहास पाहता भारतातील पाऊसमान नेहमीच आपली सरासरी गाठत असली, तरी ज्या काळात पाऊस पडण्याची जास्त गरज असते त्याच काळात पाऊस होत नसल्याने शेतीविषयक कामे अडचणीत येतात. नंतर सर्व अर्थव्यवस्थेवरच त्याचा परिणाम होतो. जूनमध्ये पावसाला सुरुवात झाली की जुलै, ऑगस्ट या दोन महिन्यांमध्ये पावसाचा हंगाम तीव्र स्वरूप धारण करतो. सप्टेंबरमध्ये मान्सून उताराला लागतो; पण गेल्या काही वर्षांमध्ये अनेक वेळा जून महिना संपूर्ण कोरडा गेला आहे आणि जुलैचा अर्धा महिनासुद्धा पावसापासून वंचित राहिला आहे.
त्यामुळे उर्वरित कालावधीमध्येच मोठ्या प्रमाणावर पाऊस पडून सरासरी गाठण्याचे काम केले जाते. पण हा पाऊस शेती कामाला फारसा उपयुक्त नसतो असेच आजपर्यंत सिद्ध झाले आहे. तापमानवाढीचा मोठा फटका सगळ्यांना बसला आहे. गेल्या अनेक वर्षांत जाणवली नसेल एवढी उष्णता यावेळी सर्वसामान्य नागरिकांना जाणवली आहे. साहजिकच शेतकऱ्यांसह सर्वजण चातक पक्ष्याप्रमाणे पावसाची वाट पाहत आहेत. जरी गेल्या तीन आठवड्यांच्या कालावधीमध्ये काही ठिकाणी वळवाच्या पावसाने हजेरी लावली असली, तरी नागरिकांना मात्र मान्सूनच्याच पावसाची अपेक्षा आहे. महाराष्ट्रच नव्हे तर देशातील अनेक राज्यांमधील धरणातील पाणीसाठे कमी होत आहेत. महाराष्ट्राचा विचार करता सर्वात मोठे धरण असलेल्या कोयना धरणातही फक्त 13 टक्के पाणी शिल्लक आहे. साहजिकच या पाण्याचा वापर करून वीज निर्मिती करायची का शेतीसाठी हे पाणी वापरायचे, याचाही विचार करावा लागणार आहे.
भारतीय शेती अजूनही मोठ्या प्रमाणात पावसावरच अवलंबून असल्याने जोपर्यंत पाऊस होत नाही तोपर्यंत शेतीच्या कामांना वेग येत नाही. दुसरीकडे या चार महिन्यांच्या कालावधीमध्ये होणाऱ्या पावसाच्या पाण्यावरच धरणे, बंधारे, नद्या आणि इतर पाणी साठ्यामध्ये वाढ होत असते. या चार महिन्यांच्या कालावधीमध्ये निसर्गाने पावसाच्या माध्यमातून दिलेले पाणीच उर्वरित आठ महिन्यांच्या कालावधीसाठी वापरावे लागत असते. जेव्हा जेव्हा मान्सूनचे आगमन लांबते तेव्हा समाजातील आणि अर्थव्यवस्थेतील विविध घटकांना चिंता वाटणे साहजिकच असते. यामध्ये महत्त्वाचे काम सरकारला करावे लागते. दुष्काळी स्थिती निर्माण झाली तरी सरकारला नियोजन करावे लागते आणि अति पाऊस झाला तरीसुद्धा सरकारलाच काम करावे लागते. सरकारी पातळीवर आणि त्या त्या शहरांमध्ये स्थानिक प्रशासनाच्या पातळीवर विविध पावसाळी कामे हाती घेण्यात आली आहेतच. पण जोपर्यंत प्रत्यक्ष पावसाळी हंगामाला सुरुवात होत नाही तोपर्यंत चिंतेची परिस्थिती मात्र कायम राहणार आहे.
एकीकडे सर्वसामान्य नागरिकांची पाण्याची गरज भागवत असतानाच दुसरीकडे शेतीच्या कामांसाठीसुद्धा जलसिंचनाच्या माध्यमातून पाणी उपलब्ध करून देण्याची जबाबदारी सरकारला घ्यावी लागणार आहे. हवामान खात्याच्या अंदाजाप्रमाणे येत्या तीन ते चार दिवसांमध्ये जरी केरळमध्ये मान्सूनचे आगमन होणार असले तरी त्याचवेळी एका “बिपरजॉय’ नावाच्या चक्रीवादळाचाही धोका निर्माण झाला आहे. हवामान खात्याने दिलेल्या माहितीप्रमाणे भारतीय किनारपट्टीला या वादळाचा धोका नसला, तरी गेल्या काही वर्षांत “निसर्ग’ किंवा “तौक्ते’ या दोन चक्रीवादळांनी किती मोठ्या प्रमाणात भारतीय किनारपट्टीला फटका बसून नुकसान केले होते. म्हणूनच पावसाची प्रतिक्षा करत असतानाच या चक्रीवादळाच्या संभाव्य धोक्यापासून सावध राहावे लागणार आहे. जोपर्यंत मान्सूनचे आगमन होत नाही आणि तो व्यवस्थित स्थिरावत नाही तोपर्यंत समाजातील सर्वच घटकांना उपलब्ध पाण्याचा नियोजनबद्ध पद्धतीने वापर करावा लागणार आहे.
महानगरांमध्ये जरी विकतचे बाटलीबंद पाणी उपलब्ध होत असले तरी देशाच्या कानाकोपऱ्यातील छोट्या गावांमध्ये मात्र असे विकतचे पाणी घेऊन तहान भागवणे अनेकांना परवडू शकत नाही, हेसुद्धा लक्षात घ्यावे लागेल. गेल्या वर्षीचा अनुभव पाहता अगदी ऑक्टोबर महिन्याच्या अखेरपर्यंत अनेक ठिकाणी पाऊस हजेरी लावत होता. तेव्हा सर्वसामान्य नागरिकांच्या मनात “जा रे जा रे पावसा’ हे शब्द रुंजी घालत होते. पण यावर्षी मात्र सामान्य नागरिकांसह शेतकऱ्यांनासुद्धा “येरे येरे पावसा’ हाच मंत्र जपावा लागत आहे. लवकरच सर्वकाही नैसर्गिक परिस्थिती सुरळीत होऊन मान्सून येत्या काही दिवसांमध्ये हजेरी लावेल आणि तापलेल्या धरतीला शांत करून बळीराजाच्या चेहऱ्यावरही हसू आणेल, अशीच आशा करावी लागेल.